लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी नागपुरातील थांबलेल्या दोन वारकऱ्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मधुकर तुकारामजी शेंडे (५६, राजाबक्षा, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (२२) असे मृतक वारकऱ्यांची नावे आहेत. दोघेही निस्सिम विठ्ठलभक्त होते. शेंडे हे नेहमीप्रमाणे यंदादेखील उत्साहाने वारीत सहभागी झाले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता.
बरड जवळील टोलनाका येथे मुक्कामसाठी टेंट उभारताना तुषार यांने लोखंडी रॉडला हात लावल्यानंतर त्यांना शॉक बसला. तुषार रॉडला चिटकल्याने त्यांना बाजूला काढण्यासाठी पुढे आलेले मधुकरराव हेही तुषार यांना चिटकले. तेव्हा दोघांना विजेचा शॉक बसला. त्यावेळी जवळच्या काही वारकऱ्यांनी तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला कॉल केला. दोघांनाही उपचारासाठी दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघेही उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.
याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या घटनेमुळे त्यांच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली होती. शेंडे हे अविवाहित होते व त्यांनी संपूर्ण जीवन वारकरी सेवा व समाजसेवेला अर्पण केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते. विविध सामाजिक संघटनांशी ते जुळले होते. तसेच सत्संग व विविध धर्मकार्यातदेखील सहभागी व्हायचे. त्यांच्यावर सोमवार ३० जून रोजी दुपारी दोन वाजता नागपुरात अंत्यसंस्कार होतील अशी माहिती त्यांचे परिचित चंद्रकांत चकोले यांनी दिली. शेंडे व तरुण तुषार त्यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रवर्तुळात शोककळा पसरली असून विठ्ठलाचे दर्शन घेण्याअगोदरच असा प्रकार झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे