नागपूर जिल्ह्यातील कुही - वडोदा मार्गावर टिप्परच्या धडकेने दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:44 IST2018-04-07T22:44:38+5:302018-04-07T22:44:57+5:30
भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचा कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही - वडोदा मार्गावरील नान्हा मांगली (ता. कामठी) शिवारात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे कुही शहरात तीव्र पडसाद उमटले.

नागपूर जिल्ह्यातील कुही - वडोदा मार्गावर टिप्परच्या धडकेने दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचा कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही - वडोदा मार्गावरील नान्हा मांगली (ता. कामठी) शिवारात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे कुही शहरात तीव्र पडसाद उमटले.
देवेंद्र ऊर्फ चिकू लक्ष्मीकांत भगत (३४) व सूरज रमेश मांढरे (२४) दोघेही रा. कुही अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मौदा येथील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पात नोकरीला असल्याने ते शनिवारी सकाळी एमएच-३१/बीई-३८३५ क्रमांकाच्या मोटरसायकलने नेहमीप्रमाणे कुही - वडोदा (ता. कामठी) मार्गे मौद्याला कामावर जात होते. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तसेच कंत्राटदारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ तयार झाली आहे. कारण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित मुरमाचा वापर केला जात आहे. दोघेही नान्हा मांगली शिवारात पोहोचताच भरधाव टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघात होताच दोघांनाही लगेच कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती देवेंद्रला मृत घोषित केले तर सूरजवर उपचार सुरू केले. मात्र, काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. दोघेही आपापल्या घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर या अपघातामुळे मोठा आघात झाला. या प्रकरणी कुही पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरण पुढील तपासासाठी मौदा पोलिसांकडे वर्ग केले.
तहसील कार्यालयावर मोर्चा
या घटनेचे पडसाद म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी शनिवारी दुपारी कुही तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे तहसीलदार विनिता लांजेवार यांनी कंत्राटदार कंपनीचे अधिकारी के. जी. सिंग यांना तहसील कार्यालयात बोलावले. शिवाय, अपघाताला जबाबदार ठरलेला टिप्पर जप्त करून मौदा पोलिसांच्या स्वाधीन केला. यावेळी प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे तसेच ही रक्कम आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने नागरिक शांत झाले. चर्चेत तहसीलदार लांजेवार, ठाणेदार प्रकाश हाके, ईश्वर धनजोडे, आशिष आवळे, प्रशांत दशमवार, हरीष कढव व नागरिक सहभागी झाले होते.