लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अजूनही चिंता कमी झालेली नाही. रुग्णसंख्या रोज वाढत नसली तरी मृतांची संख्या जास्त आहे. ब्रेक द चेन धोरणाअंतर्गत महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम आहेत. आठवडी बाजारांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही बुधवारी सक्करदरा येथील बुधवार बाजार, जयताळा बाजार व मंगलमूर्ती चौक परिसरात बाजार भरला होता. मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी तिन्ही बाजारातील भाजी विक्रेत्यांना हुसकावून लावले.
कोरोना संक्रमणाचा धोका विचारात घेता शहरातील आठवडी बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. आवश्यक सेवेतील दुकाने सकाळी ११ पर्यत सुरू ठेवण्याला परवानगी आहे. असे असतानाही जयताळा बाजारात भाजी विक्रेत्यांनी दुकाने लावली होती. याची माहिती मिळताच एनडीएस व झोनचे पथक पोहोचले. पथकांनी विक्रेत्यांना हुसकावून लावले.
रघुजीनगर झोन क्षेत्रातील सक्करदरा येथील बुधवार बाजारात सकाळी भाजीविक्रेत्यांनी दुकाने लावली होती. पथकाने बाजाराचा परिसर खाली केला. तसेच नेहरूनगर झोन क्षेत्रातील मंगलमूर्ती चौक परिसरात भरणारा बाजारही हटविण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमधील त्रिमूर्ती मटन मार्केट बंद करण्यात आले.