कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी मंत्रालयांचे रिपोर्ट कार्ड सादर करून नंबर दिले आहेत. महिला बालविकास विभागाला पहिला क्रमांक दिला आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे आश्वासन पूर्ण केले नाही. १५०० चे पण नीट पुर्ण करत नाही. महिलांची दिशाभूल करू शकतो असे दाखवले त्यामुळे या विभागाला पहिला क्रमांक दिला असेल. तर राज्यातील नागरिक रस्त्यांवर गचके खात आहेत. त्यामुळे त्यांना सरकारची आठवण येते म्हणून बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक दिला असावा, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डवर केली.
शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मी अनेक वर्ष मंत्री राहिलो आहे. त्यामुळे महायुती सरकारचे रेटिंग देण्याचे काय निकष आहेत हे तपासले पाहिजे. सर्वच स्तरावर हे विभाग अपयशी ठरले आहेत. आधार नसलेल्यांना संजय गांधी निराधारचा लाभ दिला जातो. मात्र चार महिने पासून त्यांना पैसे गेले नाही. निराधार लोकांची काळजी घेऊ शकत नाही म्हणजे, कुचकामी सरकार आहे. हे सरकार १०० दिवसात अपयशी ठरले,असा ठपका त्यांनी ठेवला. पिक विमा योजना बंद केली यासाठी कृषी विभागाला तिसरे स्थान दिले आहे. सर्व रस्त्यांवरील एसटी बंद पडलेल्या, खळखळ झालेल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करू शकत नाही प्रवासी हवालदील झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी अपयशी लोकांना पाहिले स्थान देणारा क्रम लावला की काय अशी अशी शंका येते. मंत्रिमंडळाचे जे वातावरण आहे त्याचा सुद्धा परिणाम यावर निकालावर दिसतोय. सामान्य प्रशासन विभागाची खराब कामगिरी दाखवली. याबाबतीत मुख्यमंत्री खरे बोलले, असा चिमटाही त्यांनी घेतला.
नितेश राणे यांचे महान कार्यनितेश राणे यांचे महान कार्य राज्यात सुरू आहे. दोन समाजात भेद कसा निर्माण करता येईल, यावर एकमेव कार्यक्रम ते राबवत असल्यामुळे त्यांना पाचव स्थान दिले असेल, असा टोला थोरात यांनी लगावला.
दोन पवारांमध्ये काय सुरू आहे ?शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही कॅमेऱ्यापुढे जास्त येत असतात. त्यांनाच यावर विचारलं पाहिजे. नेमकं त्यांचं काय सुरू आहे, यावर मला काही सांगता येणार नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.