वाहतूक नियमांची पाचवी चूक ठरेल आता शेवटची! मोटारगाडी, लायसन्स होणार रद्द
By सुमेध वाघमार | Updated: January 24, 2026 13:53 IST2026-01-24T13:52:46+5:302026-01-24T13:53:38+5:30
केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल

वाहतूक नियमांची पाचवी चूक ठरेल आता शेवटची! मोटारगाडी, लायसन्स होणार रद्द
सुमेध वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वाढते अपघात, बेशिस्त वाहनचालकांमुळे जाणारे निष्पाप जीव पाहता केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८९ मध्ये बदल करत एका वर्षात पाचवेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द व ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात अपघातांचे भीषण वास्तव धक्कादायक आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान ३१,९५९ अपघातांत १३,९२१ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ३२,७८३ अपघातांत १४,१८५ मृत्यू झाले, तर २०२५ मध्ये ३३,००२ अपघातांत १४,०६६ जणांना जीव गमवावा लागला. दंडाच्या रकमा वाढवूनही अपघात कमी न झाल्याने, सरकारने आता थेट वाहनचालकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे.
आता कायमस्वरूपी कारवाई होणार
एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाचवेळा वाहतूक नियम मोडले, तर संबंधित वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन) रद्द होईल, सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार. याचा अर्थ, असा वाहनचालक पुन्हा रस्त्यावर वाहन चालवूच
शकणार नाही.
अपीलची संधी, पण ठरावीक अटीनुसारच
चालान जारी झाल्यापासून वाहन मालकाला ४५ दिवसांचा ‘ग्रेस पिरीयड’ (सवलतीचा काळ) दिला जाईल. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक असेल. चालानविरुद्ध ४५ दिवसांच्या आत संबंधित प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येईल. प्राधिकाऱ्याला ३० दिवसांच्या आत त्या अर्जावर निकाल देणे बंधनकारक आहे. अन्यथा ते चालान आपोआप रद्द होईल.
प्राधिकाऱ्याचा निकाल विरोधात गेला, तर ३० दिवसांत दंड भरावा लागेल. यावर चालक न्यायालयात दाद मागू शकतात. मात्र, त्यापूर्वी दंड रकमेच्या ५० टक्के रक्कम परिवहन विभागाकडे जमा करणे अनिवार्य असेल. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.