भारतातील सध्याचे वातावरण प्रचंड दहशतवादी - श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:13 AM2022-04-18T10:13:26+5:302022-04-18T10:14:09+5:30

नागपूर : वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, ...

The current situation in India is hugely terrorist says Shripal Sabnis | भारतातील सध्याचे वातावरण प्रचंड दहशतवादी - श्रीपाल सबनीस

भारतातील सध्याचे वातावरण प्रचंड दहशतवादी - श्रीपाल सबनीस

googlenewsNext


नागपूर: वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, रक्त सांडले जात आहे. हे साहित्यिकांना अपेक्षित नसल्याचे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे केले. 

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलनात रविवारी अध्यक्षस्थानाहून सबनीस बोलत हाेते. संमेलनाचे उद्घाटन माजी कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष हेमंत काळमेघ, साहित्यिक डॉ. शोभा रोकडे, मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, प्राचार्य डॉ. जे.डी. वडते आदी उपस्थित होते. 

सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. जगात बायडेन, पुतीन, जेलेन्स्की यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र, शेक्सपिअर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्याही गटाचे नाहीत, ते साऱ्या जगाचे नायक आहेत. तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी कधीही पडेल. वैज्ञानिक हे प्रतिभावंत आहेत. मात्र, ते नव्या हिटलरच्या हातात जीवघेणी हत्यारे सोपवित आहेत. ते माणुसकीचे मारेकरी झाले असल्याचे डॉ. सबनीस म्हणाले. 

याप्रसंगी कादंबरीकार शेषराव शंकरराव खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विजया मारोतकर, चरणदास वैरागडे, आनंदी चौधरी, मंगेश बावसे, अरुणा कडू, पल्लवी उमरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

‘घरात पुस्तकांची श्रीमंती असावी’ -
आपल्या घरात पैशांची श्रीमंती नसेल तरी चालेल. मात्र, पुस्तकांची श्रीमंती असावी. महिलांनी साड्यांचे, चपलांचे कपाट खूप तयार केले. मात्र, त्यात पुस्तकांचेही कपाट असावे, असे आवाहन डॉ. शोभा रोकडे यांनी यावेळी केले.

साहित्य संमेलने कंटाळवाणी - देशमुख
साहित्य संमेलने ही कंटाळवाणे होत असतील तर त्यात आम्ही कशाला यावे, असा प्रश्न पडतो आहे. याचा विचार आयोजकांनी करणे अपेक्षित असून, वर्तमानात इंग्रजी ही ज्ञानाची व व्यवहाराची भाषा असली तरी मायमराठी विसरून चालणार नाही, अशी भावना माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.
 

Web Title: The current situation in India is hugely terrorist says Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.