दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 23:41 IST2025-11-10T23:39:07+5:302025-11-10T23:41:09+5:30
दहा वर्षांत देशाअंतर्गत १२ दहशतवादी हल्ले : जम्मू-काश्मीरमध्ये दीड हजारांहून अधिक दहशतवादी घटना

दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संबंधित स्फोट हा ‘आयईडी’ किंवा ‘आरडीएक्स’मुळे झाला का याची चाचपणी सुरू आहे. मात्र या स्फोटामुळे देशाअंतर्गत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. २०१४ सालापासून देशाअंतर्गत दहशतवादी हल्ल्यांत कमी आल्याचा दावा करण्यात येत होता. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दहा वर्षांत जम्मू-काश्मीर, नक्षलप्रभावित भाग वगळता देशाअंतर्गत १२ दहशतवादी हल्ले नोंदविण्यात आले व त्यात १४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र दहशतवादाशी निगडीत असलेल्या दीड हजारांहून अधिक घटनांची मागील दहा वर्षांत नोंद झाली.
दिल्लीतील स्फोटानंतर विविध कयास लावण्यात येत आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर स्फोटक साठा जप्त केल्यानंतर लगेच दिल्लीतील स्फोट झाल्याने हा दहशतवादी हल्ला आहे का या दिशेने सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरू आहे. मागील काही वर्षांत देशातील अंतर्गत भागांत दहशतवादी हल्ल्यांची संख्या नियंत्रणात आली होती. २०१४ ते २०२५ या कालावधीत १२ दहशतवादी हल्ले झाले व त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. तर ११ सुरक्षा जवानांचा त्यात मृत्यू झाला.
देशाअंतर्गतचा सर्वात मोठा शेवटचा स्फोट केरळमध्ये झाला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी कन्व्हेंशन सेंटरमध्ये प्रार्थनासभेत झालेल्या स्फोटांत आठ जणांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यात तीन जणांचा जीव गेला होता, मात्र त्यानंतर उपचारादरम्यान पाच जणांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर २०२४ मध्ये बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला होता व त्यात आठ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरचा देशाअंतर्गतच्या शहरांतील हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे.
जम्मू-काश्मीर ठरले दहशतवाद्यांचे ‘टार्गेट’
२०१४ सालापासून एकीकडे देशाअंतर्गतच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण आले होते. मात्र दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मात्र दहशतवादी घटना सुरूच होत्या. २०१४ ते २०२४ या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये १ हजार ५०० हून अधिक दहशतवादी घटना घडल्या. २०१८ पासून या संख्येत घट दिसून आली.
देशाअंतर्गत झालेले दहशतवादी हल्ले (जम्मू-काश्मीर वगळता)
वर्ष : दहशतवादी हल्ले : नागरिकांचा मृत्यू : सुरक्षाजवानांचा मृत्यू
२०१४ : ३ : ४ : ०
२०१५ : १ : ३ : ४
२०१६ : १ : १ : ७
२०१७ : ० : ० : ०
२०१८ : १ : ३ : ०
२०१९ : ० : ० : ०
२०२० : ० : ० : ०
२०२१ : १ : ० : ०
२०२२ : ३ : ० : ०
२०२३ : १ : ३ : ०
२०२४ : १ : ० : ०
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना
वर्ष : घटना : नागरिकांचा मृत्यू : सुरक्षाजवानांचा मृत्यू
२०१८ : २२८ : ४० : ९१
२०१९ : १५३ : ३९ : ८०
२०२० : १२६ : ३२ : ६३
२०२१ : १२९ : ३७ : ४२
२०२२ : १२५ : २६ : ३२
२०२३ : ४६ : १४ : ३०