तो' टाइपरायटर धूळखात ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टाइपरायटर अंधाऱ्या खोलीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:23 IST2025-01-27T12:21:00+5:302025-01-27T12:23:01+5:30
Nagpur : बाबासाहेबांच्या वस्तू असलेले वस्तुसंग्रहालय अद्याप नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही.

That typewriter is in the dust! Dr. Babasaheb Ambedkar's typewriter is locked in a dark room.
योगेंद्र शंभरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या टाइपरायटरच्या आधारे संविधानाचा मसुदा तयार केला होता. तो टाइपरायटर चार वर्षांपासून बंद खोलीत धूळखात आहे. चिचोली शांतीवन येथील बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयातून टाइपरायटर रासायनिक प्रक्रियेसाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. परंतु अनुकूल वातावरण नसल्याने टाइपरायटर पुन्हा प्रदर्शनात ठेवता येत नाही. यामुळे २६ जानेवारीला राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी हा ऐतिहासिक टाइपरायटर लोकांच्या नजरेपासून दूरच राहिले.
संग्रहालय चालवणाऱ्या भारतीय बौद्ध परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ऐतिहासिक टाइपरायटर आणि इतर वस्तूंच्या जतनासाठी आवश्यक तापमान राखण्यासाठी एअर कंडिशनर (एसी) यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. या वस्तूंच्या देखभालीसाठी शांतीवन, चिचोली येथील जागेत प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे.
बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयातील मौल्यवान वस्तूंचे जतन करण्यासाठी निधीची भारतीय बौद्ध परिषदेकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती, अखेर २०११ मध्ये शासनाने ४० कोटी रुपये मंजूर केले. यातून बाबासाहेबांचे टाइपरायटर, कपडे, चष्मा, काठी, पेन, कंदील, कागदपत्रांसह सुमारे १३५८ वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. एनआयटीने संग्रहालय इमारतीचे बांधकाम केले आहे. शासनाने १७ कोटींचा निधी देऊन इतर इमारती बांधल्या. मात्र या इमारतींमध्ये फर्निचर, शोकेस आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव आहे.
बाबासाहेबांच्या वस्तू असलेले वस्तुसंग्रहालय अद्याप नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही.
रासायनिक प्रक्रिया करूनही गेल्या ४-५ वर्षांपासून वस्तू एका छोट्या खोलीत ठेवल्या आहेत.
योग्य वातावरण तयार न झाल्यास हा वारसा पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.
"बाबासाहेबांनी या टाइपरायटरवर २ वर्षे ११ महिने १८ दिवस संविधान टाइप केलेले टाइपरायटर चिचोली संग्रहालयात आहे. त्यावर रासायनिक प्रक्रिया आणि संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. परंतु ऐतिहासिक वस्तूसाठी अनुकूल वातावरण व सुविधा उपलब्ध नाहीत. विकासकामांसाठी १७४ कोटींचा प्रस्ताव परिषदेने दिला होता. मात्र शासनाने निधी दिला नाही. बाबासाहेबांच्या वस्तू एका खोलीत बंद आहेत. राज्य सरकारने किमान ६० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा वस्तू पुन्हा खराब होतील."
- संजय पाटील, भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन, चिचोली