अखेर स्वाधार योजनेचा ६० कोटी रूपयांचा निधी मिळाला; विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार
By आनंद डेकाटे | Updated: May 17, 2023 17:30 IST2023-05-17T17:30:04+5:302023-05-17T17:30:33+5:30
Nagpur News राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

अखेर स्वाधार योजनेचा ६० कोटी रूपयांचा निधी मिळाला; विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार
आनंद डेकाटे
नागपूर : राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने समाज कल्याण विभागास ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासोबतच स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुलभता निर्माण होणार आहे व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे.
राज्यात समाज कल्याण विभागामार्फत ४४१ शासकीय वसतिगृह कार्यरत असून त्यामध्ये ६० हजार विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे २५हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना ६० हजार ते ४८ हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. यापूर्वी शासनाने नुकतेच सदर योजनेसाठी रुपये १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच १२ मे रोजी रुपये ६० कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयुक्तालयास उपलब्ध झाला आहे.
समाज कल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण व यशस्वी योजना आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये
- डॉ.प्रशांत नारनवरे,समाज कल्याण आयुक्त