देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 20:27 IST2019-01-29T20:21:55+5:302019-01-29T20:27:17+5:30
जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. यावेळी देशातील सैनिकांची मूठ मजबूतच हवी असे आग्रही प्रतिपादन करत त्यांनी देशवासीयंना भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन केले होते.

देशप्रेमाचे स्फुलिंग जागविणारे ‘जॉर्ज’ यांचे ‘ते’ भाषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जॉर्ज फर्नांडिस यांचे उपराजधानीशी कार्यकर्ता जीवनापासून जुने ऋणानुबंध होते. संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील त्यांनी शहराशी आपला जिव्हाळा जपला होता. ‘लोकमत कारगील शहीद निधी’द्वारे उभारलेल्या सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. यावेळी देशातील सैनिकांची मूठ मजबूतच हवी असे आग्रही प्रतिपादन करत त्यांनी देशवासीयंना भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे आवाहन केले होते.
२१ जून २००० रोजी सिव्हिल लाईन्स येथील हिस्लॉप महाविद्यालयाजवळील जागेत वसतिगृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री हरीन पाठक, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व तत्कालीन खासदार विजय दर्डा, तत्कालीन ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री तसेच ‘लोकमत’चे वर्तमान ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी झालेल्या जोशपूर्ण भाषणात जॉर्ज फर्नांडिस यांनी देशप्रेमाचे स्फुलिंग जागविले होते. स्वातंत्र्याची लढाई आपण का लढलो होतो, कुठली मूल्ये त्यामागे होती, सैनिक सीमेवर धारातिर्थी का पडत आहेत आणि आपण नेमके कुठे आहोत, असे प्रश्नच त्यांनी नागरिकांसमोर उपस्थित केले होते. सैनिकांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान हे भ्रष्टाचार व अत्याचार मिटविण्यासाठी होते. वाईट कामे करणाऱ्यांना सूट देण्यासाठी नव्हते. सैनिक आपल्या देशाची मूठ आहे. ती मजबूत असलीच पाहिजे. अर्धांगवायू झालेले बाहू चालणार नाहीत. यासाठी देशाला भ्रष्टाचारमुक्त केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले होते.
गणवेशात असलेल्या एका मेजरला कारगीलला जात असताना रेल्वे आरक्षणासाठी १०० रुपयांची लाच द्यावी लागल्याची घटना सांगत त्यांनी संपूर्ण सभागृहाला आत्मचिंतन करायला भाग पाडले होते. फर्नांडिस यांनी ‘लोकमत’च्या पुढाकाराचे विशेष कौतुकदेखील केले होते.