रुग्णांना मोफत प्रवासनागपूर : मदतनीसासह सिकलसेल रुग्णांना मोफत एस.टी.बस प्रवासाला शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाने चालविलेल्या १५ वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सिकलसेलची जागतिक स्तरावर गंभीर आजारांमध्ये नोंद आहे. सिकलसेल रु ग्णांवर नेहमी मृत्यूची तलवार टांगलेली असते, अशा रु ग्णांचा जीव वाचवणारे औषधोपचार फक्त शासकीय जिल्हा रु ग्णालये किंवा शासकीय वैद्यक महाविद्यालयांमध्येच उपलब्ध आहेत. विशेषत: या आजाराचे रुग्ण मुख्यत्वे खेड्यापाड्यात, आदिवासी व मागासवर्गीयात आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून गेल्या १५ वर्षांपासून एस.टी. बस प्रवास भाड्यात सवलत मिळावी म्हणून सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके प्रयत्नशील होते. त्यांनी आंदोलनेही केली. हिवाळी अधिवेशनात मोर्चेही काढले. दरम्यान रामटेके यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती सांगितली. नुकतेच त्यांनी याला मंजुरी दिली. रामटेके यांनी सांगितले, या निर्णयानंतर सिकलसेल रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला संबंधित जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र किंवा राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई यांनी प्रदान केलेल्या सिकलसेल ओळखपत्र असणे जरुरीचे आहे. सिकलसेल रुग्णांना मोफत बस सुविधा प्रदान करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मदतनीसासह सिकलसेल
By admin | Updated: March 14, 2015 02:48 IST