नागपूर : कळमनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची धान विक्री थंडावली आहे. कळमना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर धानाचा स्टॉक पडून आहे. एन हंगामात ही विक्री थंडावल्याने पैसा अडला. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह अन्य राज्यातून धान येत असल्याने दर पडल्याचे काही शेतकऱ्यांचे मत आहे.
परराज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाचे दर कमी असल्याने व्यापारी स्थानिक शेतकऱ्यांच्या धान खरेदीकडे पाठ फिरवित आहेत. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदीला व्यापाऱ्यांनी प्राथमिकता द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. दिल्लीत याच मुद्द्यावरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशातच आता नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (कळमना)मध्ये धान खरेदी प्रभावित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.
कामठी तालुक्यातील शेतकरी पाशु खान म्हणाले, विक्रीसाठी दलालाकडे माल नेल्यावर तो ठेवला जातो. मात्र या मार्केटमध्ये अनेक शेतकऱ्यांचा माल स्टॉक झाला आहे. बाहेरच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाची किंमत कमी असल्याने व्यापारी आमचा माल खरेदी करत नाहीत. हा धानाचा हंगाम असूनही अशी पाळी आल्याने स्थानिकांच्या खरेदीलाच प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या नावे बाजार समितीच्या प्रशासनामार्फत पत्र देण्यात आले आहे. रामटेकचे होमराज झाडे म्हणाले, गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून व्यापारी स्वस्त माल घेत आहेत. यामुळे ही समस्या आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कळमना बाजार समितीमधील दलाल गिरीश बोलधान म्हणाले, आवश्यक प्रक्रियांमुळे सरकारी काट्यावर माल विकण्यात शेतकऱ्यांना अडचण आहे. कारण ते व्यापाऱ्यांवरच अवलंबून असतात.
...
कोट
यंदा पहिल्यांदाच ही समस्या पुढे आली आहे. कोणत्याही शेतकऱ्याच्या माल खरेदीवरून मुद्दा उपस्थित होऊ शकत नाही. खरेदी करणारा व्यापारी आपल्या नियोजनानुसार माल खरेदी करतो. मात्र लवकरच यावर तोडगा काढला जाईल.
- राजेश भुसारी, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती (कळमना)
...