केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:51 IST2019-08-05T16:50:35+5:302019-08-05T16:51:01+5:30
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे.

केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत
नागपूर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र शासनाने उचललेल्या पावलाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वागत करण्यात आले आहे . केंद्राची ही भूमिका अतिशय साहसपूर्ण असल्याचे कौतुकोद्गार सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर संघ वर्तुळासह भाजपात आनंदाचे वातावरण आहे.
केंद्र शासनाच्या या साहसपूर्ण पावलाचे आम्ही स्वागत करतो. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशासाठी हे अत्यावश्यक होते. देशातील सर्वांनी आपला स्वार्थ व राजकारण यांच्या पलिकडे जात याचे स्वागत व समर्थन केले पाहिजे, असे मत डॉ.मोहन भागवत व भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
देशहिताचे पाऊल
राष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे खºया अर्थाने आज भारतात विलीनीकरण झाले आहे. ही ठो भूमिका घेण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता होती. हे देशहिताचे पाऊल असून सर्व भारतीय याचे स्वागतच करतील, असे मत समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.
काश्मीर साखळदंडातून मुक्त झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने एक नवीन इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या साखळदंडातून मुक्त करत श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नाला साकार केले आहे. हा निर्णय राष्ट्रीय एकतेला मजबूती देण्याची इच्छाशक्तीच दर्शविणारा आहे.
-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री