लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : शेतकऱ्याने ४० एकर शेतीची पेरणी व पिकाच्या मशागतीसाठी बँकेकडून पीककर्ज घेतले. पैशाची गरज असल्याने त्याने खापरखेडा (ता. सावनेर) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला; मात्र रक्कम निघाली नाही. चौकशीअंती त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ७५ हजार रुपयांची परस्पर उचल करण्यात आली असून, यासाठी त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करण्यात आला. त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली खापरखेडा येथेच झाल्याचे उघड झाले आहे.
मनीष नामदेव वाघ, रा. सुभाषनगर, नागपूर यांची मनसर (ता. रामटेक) शिवारात पाच एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी इतर शेतकऱ्यांची ४० एकर शेती ठेक्याने केली आहे. पेरणी आणि पिकाच्या मशागतीसाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या रामटेक शाखेकडून १ लाख ३५ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकूण २ लाख १५ हजार रुपये जमा होते.
ते मंगळवारी (दि. १७) मनसरहून पारशिवनी, खापरखेडा मार्गे नागपूरला जात होते. खापरखेडा येथे आल्यावर ते रक्कम काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम रूममध्ये गेले. आतील दोन्ही मशीनमधून रक्कम न निघाल्याने ते बाहेर आले. काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने १ लाख ७५ हजार रुपयांची उचल केल्याचे मॅसेज त्यांच्या फोनवर प्राप्त झाले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रामटेकच्या बँकेतून ट्रांजेक्शन सर्टिफिकेट घेतले व तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा सायबर सेल समांतर तपास करीत आहे.
असे बदलले कार्डएटीएम रूममधून बाहेर पडताच चार अनोळखी तरुण मनीषजवळ आले. यातील एकाने त्यांना बाजूच्या मशीनमध्ये पैसे असल्याचे सांगून रक्कम काढण्याची सूचना केली. मनीष यांनी एका मशीनमध्ये कार्ड टाकून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक व्यक्ती बाजूच्या मशीनजवळ उभी होती. त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे निघाले का, अशी विचारणा केली. त्यांनी मागे वळून बघताच बाजूला असलेल्या व्यक्तीने मशीनमधील मनीष यांचे कार्ड स्वतःकडे ठेवून स्वतः जवळचे कार्ड मशीनमध्ये टाकले आणि त्यांच्या कार्डचा पिन नंबर लक्षात ठेवला.
आठ ट्रांजेक्शनद्वारे रकमेची उचलमनीष वाघ खापरखेड्याहून कोराडीला पोहोचेपर्यंत त्यांच्या खात्यातून पाच ट्रांजेक्शनद्वारे प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे ५० हजार रुपयांची उचल करण्यात आली. मॅसेज प्राप्त होताच त्यांनी बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे दोन ट्रांजेक्शनद्वारे एक लाख रुपये व नंतर तिसऱ्या ट्रांजेक्शनद्वारे २५ हजार रुपये असे एकूण १ लाख २५ हजार रुपये वीरेंद्र सिंग नामक व्यक्तीच्या बँक खात्यात वळते केले. शेवटी मनीष यांनी त्यांच्या खात्यात शिल्लक राहिलेले ४० हजार रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा केले.