दोन दिवसात आरपीएफने केली ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:10 IST2020-03-25T21:08:17+5:302020-03-25T21:10:58+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात रेल्वे सुरक्षा दलाने ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे.

RPF inspects 66 trains in two days | दोन दिवसात आरपीएफने केली ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी 

दोन दिवसात आरपीएफने केली ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी 

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचे तपासणीचे आदेश : विविध दिशांना जाताहेत रिकाम्या रेल्वेगाड्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या रेल्वेगाड्या आता आपल्या मूळ ठिकाणी परत जात आहेत. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात रेल्वे सुरक्षा दलाने ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे.
रेल्वे वाहतूक बंद केल्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या ठिकठिकाणी अडकून पडल्या आहेत. रेल्वे वाहतूक सुरु करण्याचा निर्णय झाल्यास सर्व वाहतूक एकाच वेळी सुरु झाली पाहिजे, यासाठी रेल्वेने विविध ठिकाणी असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या मूळ रेल्वेस्थानकांवर पाठविणे सुरु केले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात एकूण ६६ रेल्वेगाड्या गेल्या. यात हावडा, इटारसी, मुंबई, चेन्नई या भागातील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. रिकाम्या रेल्वेगाड्या जात असल्यामुळे यात प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीत प्रवासी या रिकाम्या जाणाऱ्या गाड्यातून प्रवास करीत असतील तर ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या रिकाम्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला मिळाले आहेत. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने दोन दिवसात नागपूर रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या ६६ रेल्वेगाड्यांची तपासणी केली आहे. परंतु या गाड्यात एकही प्रवासी प्रवास करताना आढळून आला नाही.

तपासणी सुरुच राहणार
‘रिकाम्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या आपल्या मुळ रेल्वेस्थानकांवर परत जात आहेत. या गाड्यांची कसून तपासणी करून त्यात प्रवासी तर नाहीत ना याची खात्री करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. त्यानुसार रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी यापुढेही सुरुच राहणार आहे.’
आशुतोष पाण्ड्येय, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: RPF inspects 66 trains in two days