नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट :टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:13 IST2018-11-13T00:09:23+5:302018-11-13T00:13:29+5:30
कळमना बाजारात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आपला माल घेऊन येणाऱ्या मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून सोमवारीसुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. सातत्याने सुरूअसलेल्या हल्ल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी शिवसेनेचे उपशहर प्रमुख रविनीश पांडे यांच्या नेतृत्वात कळमना पोलिसांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सुरक्षेची मागणी केली.

नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट :टोळी सक्रिय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना बाजारात शेतकऱ्यांना लुटणारी टोळी सक्रिय आहे. कळमना बाजारात विक्रीसाठी आपला माल घेऊन येणाऱ्या मोसंबी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून सोमवारीसुद्धा एका शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. सातत्याने सुरूअसलेल्या हल्ल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी शिवसेनेचे उपशहर प्रमुख रविनीश पांडे यांच्या नेतृत्वात कळमना पोलिसांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सुरक्षेची मागणी केली.
शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक तिजारे यांना सांगितले की, ते ट्रक किंवा ट्रॅक्टरने संत्रा-मोसंबी घेऊन कळमना बाजारात येतात. पहाटे लिलावाच्या वेळी जेव्हा फळांनी भरलेले ट्रक उघडले जातात. नेमक्या त्याच वेळी ही टोळी शेतकऱ्यांवर हल्ला करते. चाकूचा धाक दाखवून फळ घेऊन फरार होतात. अनेक शेतकरी या हल्ल्याचे शिकार झाले. जीव मुठीत घेऊनच त्यांना बाजारात यावे लागत आहेत. समस्या जैसे थे आहे. एपीएमसी अधिकारी बागडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी सांगितले की, असामाजिक तत्त्व बाजारात असलेल्या गार्डला मारहाण करून पळवून लावतात. फळ व्यापारी नौशाद भाई यांनी सांगितले की, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांसाठी व्यापारी बाजार समितीला सेस देतात. परंतु समिती सुरक्षेवर लक्ष देत नाही.
सुरक्षा मिळाल्याशिवाय लिलाव नाही
रविनीश पांडे यांनी यावेळी सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांची सुरक्षा निश्चित होत नाही. तोपर्यंत फळांचा लिलाव होणार नाही. प्रशासन शेतकऱ्यांची सुरक्षा करू शकत नसेल तर शिवसैनिक शेतकरी व त्यांच्या मालाची सुरक्षा करतील. दरम्यान सोमवारीसुद्धा शेतकरी भगवानदास आणि त्यांच्या सहकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.