वीज तक्रारींचे निराकरण आता जागेवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST2021-01-19T04:09:03+5:302021-01-19T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्ती कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी ...

वीज तक्रारींचे निराकरण आता जागेवरच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्ती कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या महावितरणच्या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. नागपूर परिमंडळ कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, कामठी, सावनेर या तालुक्यांमधील काही गावांमध्ये ‘एक गाव - एक दिवस’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमधील गावांमध्येही लवकरच ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेतून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट ग्रामस्थांशी संवाद साधून मोबाईल अॅप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करणार आहेत.
या मोहिमेंतर्गत तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीज पुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गंजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामे केली जाणार आहेत. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ती उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर घेणे अशाप्रकारची कामेही करण्यात येणार आहेत.