रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
By नरेश डोंगरे | Updated: May 30, 2025 21:21 IST2025-05-30T21:20:34+5:302025-05-30T21:21:24+5:30
अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
नरेश डोंगरे
नागपूर : हजारो कोटींच्या खर्चाने महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क प्रशस्त करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुन्हा एका रेल्वे स्थानकाचे नाव आणि कोड बदलविला आहे. सोबतच राज्यातील पुन्हा दोन रेल्वे स्थानकांची नावं आणि कोड भारतीय रेल्वेच्या नकाशावर बदललेली दिसणार आहे.
अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सोबतच नवीन सेकंड, थर्ड आणि फोर्थ लाईनची (ट्रॅकची) निर्मिती, त्यासाठी जागोजागी बांधण्यात आलेले ओव्हर ब्रीज आणि अंडर ब्रीज, अॅटोमेटीक सिग्नल सिस्टमसह वेगवेगळ्या नव्या सिस्टम सुरू करून एकूणच भारतीय रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कला नवीन लूक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे करतानाच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातील चार रेल्वे स्थानकांची नावं बदलविण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूरच्या ईतवारी रेल्वे स्थानकाचे नाव 'नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक' असे करण्यात आले. आता
भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नवीन नावाला आणि कोडला मंजूरी दिली आहे. आधी या स्थानकाचे नाव उस्मानाबाद रेल्वे स्टेशन आणि कोड यूएमडी होता. तर आता रेल्वेच्या नकाशावर या स्थानकाचे नाव धाराशिव तर कोड डीआरएसव्ही राहणार आहे. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी ३१ मे च्या रात्री ११.४५ पासून तो पुढच्या पावणेदोन तासांसाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) बंद केली जाणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांची नावं बदलली गेली आहे. तर, अहमदनगर आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलाच्या प्रतिक्षेत आहे. आधी झालेल्या निर्णयानुसार, अहमदनगर रेल्वे स्थानकाला अहिल्यानगर रेल्वे स्थानक आणि औरंगाबाद स्थानकाला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक म्हणून नाव दिले जाणार आहे.
अंमलबजावणीसाठी उच्चस्तरावर प्रयत्न
अहिल्यानगर हे स्थानक मध्य रेल्वेच्या तर छ. संभाजीनगर स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येते. या दोन्ही स्थानकांच्या नामांतराच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, उच्चस्तरावर तसे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.