पंचनामे अपूर्णच, केंद्राचे पथक शुक्रवारी येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:59 IST2020-09-10T21:57:58+5:302020-09-10T21:59:17+5:30
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

पंचनामे अपूर्णच, केंद्राचे पथक शुक्रवारी येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
गेल्या महिन्यात २९ व ३० आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. महापूर आला. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले. जनावरांचाही मृत्यू झाला. शेतीला फटका बसला. ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. सर्वाधिक नुकसान नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत झाले. राज्य सरकारने घर आणि जनावरांच्या नुकसानाकरता तातडीने मदतीची रक्कम दिली. या नुकसानाच्या पाहणीकरता केंद्राचे पथक ११ सप्टेंबर रोजी नागपुरात दाखल होणार आहे. या पथकात सहा अधिकाºयांचा समावेश आहे. तीन-तीन अधिकाºयांचे दोन गट करून पाच जिल्ह्यांची पाहणी करणार असल्याची चर्चा आहे. तीन दिवस हे पथक राहणार असल्याची माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. दहा दिवसाचा कालावधी होत असताना पंचनामे पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अतिशय गोपनीय पद्धतीने काम होत असून कुणीही बोलण्यास तयार नाही. पुरामुळे १५ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पथक कामठी, पारशिवनी व मौदा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.
विभागात १५ लाख हेक्टरमध्ये नुकसान
पुरामुळे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान भंडारा जिल्ह्यात झाले. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या पाच जिल्ह्यात १५ लाख हेक्टरमध्ये नुकसान असल्याचे सांगण्यात आले.