मनपा प्रशासनाचे अपयश पुढे आले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर बस पूर्ण क्षमतेने धावत नसल्याने शहरातील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहे. मनपा आयुक्तांना संघटना, राजकीय पक्ष व सेवाभावी संस्थांनी निवेदने सोपविल्यानंतर ३० ते ३५ टक्के बस धावत आहेत. यामुळे त्रस्त नागरिक ट्विटरच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आहे. सीएमओ महाराष्ट्रच्या ट्विटरवर मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांनी आपली बाजू मांडली आहे.
घरापासून कार्यालयात व दैनंदिन कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑटो, कॅबचे अधिक भाडे मोजून कोविड नियमांचे पालन न करता प्रवास करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून बस पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आवाहन करीत आहेत.
विशेष म्हणजे शहरात १७२ बस धावत आहेत. वास्तविक शहर बस ताफ्यात ४३७ बसेस आहेत. अनलॉक प्रक्रियेनंतर सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. शाळा उघडल्या आहेत. परंतु शहर बस पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. नागरिकांनी टॅक्समधून मनपा तिजोरीत जमा केलेल्या पैशातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतनावर खर्च होत आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवा असलेल्या शहर बसकडे दुर्लक्ष आहे. हा प्रकार फार काळ चालणार नसल्याची भावना शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
....
काही नागपूरकरांनी व्यक्त केलेल्या भावना
शहर बसच्या मर्यादित फेऱ्या असल्याने घर ते कार्यालय ये-जा करताना अडचणी येत आहेत. पूर्ण क्षमतेने शहर बस सेवा सुरू करावी.
-नितीन क्षीरसागर
मी शहर बसने प्रवास करते. अनेक मार्गावर बस सुरू नसल्याने त्रास होतो. ऑटो व टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करणे शक्य नाही. कृपया बस सुरू कराव्यात.
-प्रिया चांदूरकर
वेतनाचा मोठा हिस्सा ऑटो व कॅबवर खर्च करावा लागत आहे. बस संचालन मुख्य मार्गासह जोडणाऱ्या मार्गावरही सुरू करावे.
- किरण बाला
मी सामान्य वर्गातील आहे. कार्यालयात पोहचण्यासाठी अडचण येत आहे. बस मर्यादित असल्याने त्रास होतोय. बस सेवा लॉकडाऊन पूर्वी होती तशी सुरू करावी.
-रोहित गडीकर
शहरातील शाळा सुरू झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी अडचणी येत आहेत. बस सेवा पूर्ववत सुरू करावी.
-श्रीकांत