पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई-बस सेवेला हिरवी झेंडी
By गणेश हुड | Updated: February 14, 2026 17:39 IST2026-02-14T17:34:22+5:302026-02-14T17:39:56+5:30
नागपूरला मिळाल्या ५० ई-बसेस :पर्यावरणपूरक वाहतुकीला बळ

Prime Minister Narendra Modi gives green signal to e-bus service
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला मिळालेल्या पर्यावरणपूरक ५०इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने गुवाहाटी येथून करण्यात आले. या योजनेअंतर्गत नागपूरला १५० बसेस मिळणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० बसेस मनपाला प्राप्त झाल्या आहेत.
मनपातर्फे पी. एम ई बस सेवा कोराडी आगार येथे आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे,संदीप जोशी, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, नगरसेवक विजय झलके, प्रभारी आयुक्त वसुमना पंत, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक डॉ. मेघना वासनकर, महादुल्याच्या नगराध्यक्ष हेमलता सावजी यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित कार्यक्रमात
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण पार पडले. यावेळी नागपूरसह देशातील चार शहरांतील एम ई-बसचे आभासी लोकार्पण करण्यात आले. यात गुवाहाटी येथे १०० बसेस, नागपूर व भावनगर येथील प्रत्येकी ५०बसेस तर चंदीगड येथील २५ बसेसचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवी झेंडी दाखवून चार शहरातील पर्यावरणपूरक बसचे लोकार्पण केले. पंतप्रधानांनी झेंडी दाखविल्यानंतर कोराडी आगारमध्ये सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. प्रारंभी दीपप्रज्वलनाणे कार्यकमाची सुरुवात करण्यात आली. महापौर नीता ठाकरे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत केले.
दिव्यांगांसाठी विशेष 'हायड्रोलिक ई-रॅम्प'
या अत्याधुनिक पी.एम. ई-बसमध्ये २५ प्रवाशांच्या बसण्याची उत्तम सोय असून, दिव्यांगांसाठी विशेष 'हायड्रोलिक ई-रॅम्प' बसवण्यात आले आहेत. याशिवाय, अवघ्या ३० मिनिटांच्या 'रॅपिड चार्जिंग'वर ही बस २२५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. यामुळे विनाअडथळा आणि कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे. या बसेस शहरातील एकूण ११ महत्त्वाच्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
प्रदुषण मुक्त वाहतुकीला बळ : महापौर
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात विकासाच्या एका वेगळ्या वाटेवर जात आहे. ई बसमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व पर्यावरण पूरक होण्याला मदत मिळणार आहे. शहरातील दळणवळ व पर्यावरण हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहे. या दोन्ही प्रश्नांची जाण ठेऊन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून शहराला पर्यावरणपूरक बस देण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.