अपघात मृत्यू रोखण्यासाठी तीन वर्षाचा कृती आराखडा तयार करा
By आनंद डेकाटे | Updated: January 22, 2025 16:26 IST2025-01-22T16:25:01+5:302025-01-22T16:26:41+5:30
मुख्य सचिव सुजाता सौनिक : रस्तासुरक्षा संदर्भात नागपूर-अमरावती विभागाचा आढावा

Prepare a three-year action plan to prevent accidental deaths
आनंद डेकाटे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते अपघात टाळण्यासोबतच शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी येत्या तीन वर्षाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करून प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी संबंधित विविध यंत्रणांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर व अमरावती विभागातील रस्ते सुरक्षा तसेच अपघात नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात मुख्य सचिव सौनिक यांनी बुधवारी आढावा घेतला. रस्त्यावरील शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी सेव्हलाईफ फाऊंडेशनसह विविध संस्थांसोबत वर्ष २०२८ पर्यंतचा कृती आराखडा तयार करावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त वाहतूक अर्चित चांडक तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भीमनवार, सेव्हलाइफ फाऊंडेशनचे पियुष तिवारी उपस्थित होते.
सकाळी ६ ते १० व रात्री ६ ते ९ यावेळात अपघात टाळण्यासाठी हे करा
- राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, अपघात प्रवण स्थळाच्या ठिकाणी रस्ते विभाजक, साईनबोर्ड तात्काळ लावा.
- वेग मर्यादा, हेल्मेट व सिटबेल्ट यासारख्या आवश्यक सूचना देतांनाच नागरिकांमध्ये जनजागृती करा
- अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये वैद्यकीय सुविधा व उपचार तातडीने उपलब्ध होईल यादृष्टीने अशा रूग्णालयांची नोंदणी करण्याला प्राधान्य द्या
- रस्त्यावरील तसेच फुटपाथ वरील अतिक्रमण तात्काळ काढा
- अंधार असलेल्या रस्त्यांवर विद्युत व्यवस्था, वेग मर्यादेसाठी आवश्यक उपाययोजनेसह आवश्यक मार्गदर्शक फलक लावा
- यासाठी परिवहन व महानगरपालिकांने विशेष दक्षता घ्यावी यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा
विदर्भात रस्ता अपघातातात सरासरी तीन टक्के कमी
परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी यावेळी नागपूर-अमरावती विभागात रस्त्यावरील अपघातांमध्ये सरासरी तीन टक्के कमी झाल्याची माहिती दिली. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून रस्तेसुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. परिवहन विभागातर्फे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समितीच्या सुचनेनुसार प्राधान्याने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यात अपघातात २.२२ टक्केपर्यंत कमी
जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सादरीकरणाद्वारे नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने कमी होत असून २.२२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे. यासाठी मुख्यरस्त्यांवर आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात मदत झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरात २३ अपघात प्रवण स्थळांपैकी १८ ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्यामुळे सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत अपघात कमी झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ४७ कोराडी नाका ते भारत माता चौक, जामठा टि पॉइंट, राष्ट्रीय महामार्ग ५३ उमिया आदींचा समावेश आहे.