नागपुरातील प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींनी फसविल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 00:40 IST2019-10-26T00:39:51+5:302019-10-26T00:40:59+5:30
इंदूरमधील गुंतवणूकदारांनी वात्सल्य ग्रुपचे सीएमडी प्रफुल्ल गाडगे यांच्यावर ५०० कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप केला आहे.

नागपुरातील प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींनी फसविल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदूरमधील गुंतवणूकदारांनी वात्सल्य ग्रुपचे सीएमडी प्रफुल्ल गाडगे यांच्यावर ५०० कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गाडगे यांच्यासह त्यांचे सहकारी नवाब बेग व मनवेंद्र मजुमदार यांच्याविरुद्ध इंदूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपकर्त्यांमध्ये वैभव निमा, प्रवीणसिंग, अजय पाटीदार, सुनील पांडे, किशोर सांखला, अरुणकुमार सराफ, राजेंद्र पाटीदार, अवतारसिंग व मनजित कौर यांचा समावेश आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गाडगे यांनी वात्सल्य बिल्डर्स ग्रुप ही कंपनी स्थापन करून राऊ येथे प्रेस्टीज व उमरीखेडा येथे शिव रेसिडेन्सी-२ नावाने ले-आऊट टाकले. त्यांनी दोन वर्षात ले-आऊट विकसित करून भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे पीडितांनी २०१३ मध्ये त्या ठिकाणी भूखंड खरेदी केले. परंतु, त्यांना सहा वर्षानंतरही विकसित भूखंडाचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
‘रेरा’च्या आदेशाचे पालन नाही
पीडितांनी ‘रेरा’कडेही तक्रार नोंदवली होती. ‘रेरा’ने पीडितांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला. परंतु, गाडगे यांनी त्या आदेशाचे पालन केले नाही. तसेच, गाडगे यांनी दिलेले पोस्ट डेटेड धनादेशही अनादरित झाले. त्यांनी शिव रेसिडेन्सी-२ मधील ७५० भूखंडधारकांना फसवले. त्यांनी रहिवासी उपयोगाची जमीन नसतानाही त्यावरील भूखंड विकले व ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. त्यांनी या प्रकल्पाची ‘रेरा’मध्ये नोंदणी केली नाही असाही तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
गुंतवणूकदारांना पैसे परत केले
सर्व प्रकल्प नियमानुसार विकसित केले आहेत. शिव रेसिडेन्सी-२ प्रकल्पाकरिता काही परवानगी घेतल्या नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. प्रकल्पातील गुंतवणूकदारांना गेल्या सहा दिवसात एक कोटी रुपये परत केले आहेत. काहीजण व्याजाची मागणी करीत आहेत.
प्रफुल्ल गाडगे