दोन हजारावर प्रकरणे प्रलंबित
By Admin | Updated: July 4, 2014 01:10 IST2014-07-04T01:10:21+5:302014-07-04T01:10:21+5:30
वर्षभरापासून पूर्णवेळ माहिती आयुक्त नसल्याने नागपूर विभागातील जवळपास दोन हजारावर माहिती अधिकाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभागाचे नवीन माहिती आयुक्त वसंत पाटील यांच्यासमोर ही

दोन हजारावर प्रकरणे प्रलंबित
वर्षभरानंतर मिळाले माहिती आयुक्त : आज पदभार स्वीकारणार
नागपूर : वर्षभरापासून पूर्णवेळ माहिती आयुक्त नसल्याने नागपूर विभागातील जवळपास दोन हजारावर माहिती अधिकाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभागाचे नवीन माहिती आयुक्त वसंत पाटील यांच्यासमोर ही प्रकरणे निकाली काढणे हे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे.
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता वसंत दत्तात्रय पाटील यांची नागपूर विभागाचे राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील राज्य माहिती आयोग कार्यालयात त्यांनी बुधवारी शपथ घेतली. वसंत पाटील हे मूळचे जामनेर जळगाव येथील रहिवासी असून, पुणे येथून त्यांनी बीई सिव्हिल केले आहे. १९८० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ते सेवेत दाखल झाले. उद्या, शुक्रवारी ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील.
नागपूर विभागाचे माहिती आयुक्त बी.टी. पाटील यांची १८ जुलै २०१३ रोजी बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. औरंगाबादचे माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. महिन्यातून ते काही दिवस येथे येऊन सुनावणी घेत होते, तरी नियमित माहिती आयुक्त नसल्याने सुनावणीसुद्धा अनियमित होत होती. परिणामी प्रकरणे प्रलंबित राहत गेली. सध्या सुरू असलेल्या प्रकरणांपैकी दोन हजारांवरील प्रकरणे प्रलंबित आहेत. पूर्वीपासूनची अनेक प्रकरणे अजूनही तशीच असल्याची माहिती आहे. त्यामुळे माहिती अधिकारांतर्गत द्वितीय अपील करणाऱ्या अर्जदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रकरणांवरही परिणाम पडत होता. (प्रतिनिधी)
पुन्हा एकदा पाटील
राज्य माहिती आयोगाचा कारभार सुरू झाला तेव्हापासून नागपूर विभागाच्या आयुक्तपदी पाटील आडनावाच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. सर्वप्रथम विलास पाटील हे नागपूर व अमरावती विभागाचे संयुक्त माहिती आयुक्त होते. २७ डिसेंबर २००६ ते १३ आॅक्टोबर २०१० पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. आतापर्यंत सर्वाधिक कालावधीसाठी तेच आयुक्त होते. त्यानंतर पी.डब्ल्यू. पाटील यांनी पदभार सांभाळला. ते १५ आॅक्टोबर २०१० ते १६ जून २०१२ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्यानंतर बी.टी. पाटील आले. ते १८ जून २०१२ ते १८ जून २०१३ पर्यंत कार्यरत होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दरम्यान, औरंगाबादचे माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. आता पुन्हा वसंत पाटील यांची नियमित राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.