गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:51 IST2025-04-24T16:50:28+5:302025-04-24T16:51:15+5:30
काश्मीरच्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे वाचले कावळे कुटुंबीय

गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले
Pahalgam Terror Attack News: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, नागपूरच्या एका कुटुंबासोबतच असाच काहीसा प्रकार घडला. सोनमर्ग, गुलमर्ग, टुलीप गार्डन फिरून झाले. त्यानंतर ते कुटुंबीय पहलगामला टॅक्सीने निघाले. पहलगामला पोहचल्यानंतर त्यांनी अक्रोड, केशर विकत घेतले आणि पुढे निघाले, लगेच असा गोळीबाराचा आवाज आला. ज्या ठिकाणी दहशतवादी गोळीबार करत होते, त्या ठिकाणाहून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर होते.
टॅक्सी ड्रायव्हर जावेदला धोका लक्षात आला. त्याने पुढे न जाण्याचा सल्ला देत गाडी माघारी फिरवली आणि ते श्रीनगरला सुखरूप परतले. काश्मीरचा टॅक्सी ड्रायव्हर जावेदमुळे दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नागपुरातील व्यंकटेशनगर येथे राहणारे कावळे कुटुंबीय काश्मीर फिरायला गेले होते. डॉ. राजेंद्र कावळे यांच्यासोबत मुलगा, मुली, आवई, नातवंड, असा परिवार होता. १९ एप्रिलला ते विमानाने दिल्लीला गेले आणि तेथून विमानानेच श्रीनगरला गेले. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग फिरून झाले. त्यानंतर मंगळवारी ते पहलगामसाठी निघाले. श्रीनगर आणि परिसर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली होती. जावेद हा त्या टॅक्सीचा ड्रायव्हर होता. तीन दिवसांत तो कावळे कुटुंबीयांसोबत मिसळला होता.
कावळे कुटुंबीयांनी अगोदरच पहलगाम येथील काश्मीर पॅलेस रिसोर्ट बुक करून ठेवले होते. त्यामुळे सर्व दूर हा नियोजितच होता. पहलगामला ते पोहोचले. तेथूनच त्यांनी अक्रोड, केशर आदी खरेदी सुद्धा केले आणि नियोजित ठिकाणी ते निघाले, मात्र रस्त्यातच त्यांना गोळीबार होत असल्याचा आवाज आला. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या जावेदला पुढचा धोका लक्षात आला. त्याने ॐ कावळे कुटुंबाला पुढे न जाण्याचा सल्ला देत श्रीनगरला परत जाण्यास सांगितले, परंतु रिसोर्ट बुक असल्याने कावळे कुटुंब विचार करीत होते. त्यांना नेमके काय होत आहे, याची कल्पना आली नव्हती. खूप विचार केल्यानंतर त्यांनी जावेदचे म्हणणे ऐकले आणि परत जाण्याचा निर्णय घेतला, तसेच सीआरपीएफच्या गाड्या पोहोचल्या. ते सर्व दृश्य पाहून युद्ध सुरू झाले की काय? असे कावळे कुटुंबाला वाटू लागले. सारेच दहशतीत आले. काही वेळानंतरच त्यांना खरा प्रकार समजला. आज जावेदमुळेच आपण सुखरूप असल्याची भावना डॉ. राजेंद्र कावळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. कावळे कुटुंबीय २४ तास्खेला रेल्वेने नागपूरला परत येत आहेत.