६२५ पैकी केवळ ४५ जणांनाच हवी स्वेच्छा निवृत्ती; एसटीच्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:00 AM2021-01-28T06:00:00+5:302021-01-28T06:00:06+5:30
Nagpur news स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर वर्षाला केवळ तीन महिन्यांचे वेतन देण्याची जाचक अट एसटी महामंडळाने ठेवली. त्यामुळे नागपूर विभागात एसटीच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ ४५ कर्मचाऱ्यांनीच या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
दयानंद पाईकराव
नागपूर : स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर वर्षाला केवळ तीन महिन्यांचे वेतन देण्याची जाचक अट एसटी महामंडळाने ठेवली. त्यामुळे नागपूर विभागात एसटीच्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ ४५ कर्मचाऱ्यांनीच या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
एसटी महामंडळाने ५० वर्षे वयोगटावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना जाहीर केली. या योजनेनुसार ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना एका वर्षाला तीन महिन्यांचे वेतन देण्याची अट होती. परंतु एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ही योजना मान्य नव्हती. एसटीतील संघटनांच्या मते कर्मचाऱ्यांना एका वर्षाला सहा महिन्यांचे वेतन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची गरज होती. परंतु ही योजना लागू करण्यापूर्वी एसटी महामंडळाने महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनांना विश्वासात न घेताच ही योजना लागू केली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या योजनेला अत्यल्प प्रतिसाद दिला. एसटी महामंडळाच्या नागपूर विगागात ५० वर्षांवरील एकूण ६२५ कर्मचारी आहेत. यातील केवळ ४५ कर्मचाऱ्यांनीच स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. उर्वरित ५८० एसटी कर्मचाऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. एसटी महामंडळाने कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली असती तर या योजनेला कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असता, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
सहा महिन्यांचे वेतन, कुटुंबातील सदस्यास हवी नोकरी
‘५० वर्षे वयोगटावरील कर्मचाऱ्यांवर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, घराचे हफ्ते त्यांना द्यावे लागतात. अशा स्थितीत सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांना वर्षाकाठी केवळ तीन महिन्यांचे वेतन देणे योग्य नाही. त्यांना सहा महिन्यांचे वेतन आणि कुटुंबातील एका सदस्यास नोकरी दिली असती तर या योजनेस प्रतिसाद मिळाला असता.’
- अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
.........