नागपूर-अमरावती महामार्गावरील भीषण अपघातातून वाचलेल्या मुलीनेही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:11 IST2018-02-17T14:08:34+5:302018-02-17T14:11:00+5:30
शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या इव्हाना खान या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सकाळी तिच्या निधनाने अखेरीस संपली.

नागपूर-अमरावती महामार्गावरील भीषण अपघातातून वाचलेल्या मुलीनेही सोडले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या इव्हाना खान या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सकाळी तिच्या निधनाने अखेरीस संपली. या अपघातातील एकूण मृतांची संख्या आता ७ झाली आहे.
शुक्रवारी असा घडला होता अपघात
शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ हा भीषण अपघात घडला. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिस्लॉप कॉलेजचे ८ विद्यार्थी निशा राजेंद्र निकम (२१), विशाल रथवानी (२१), सत्या सिंग (२०), दिव्या पकू (२१), धीरज पथाडे (२१), मैत्रेय आवळे (२२), शाहबाज जाफर अलवी (२२) आणि इव्हाना परवीन खान (वय २२) अमरावतीकडे पार्टीसाठी गेले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास ते तिकडून अर्टिका कार (एमएच ४०/ एसी ९२०१) ने नागपूरकडे परत येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. धावत्या कारमध्ये ते गंमतजंमत करत येत होते. वडधामनाजवळच्या शहनाज हॉटेलसमोर अचानक भरधाव कार उभ्या कन्टेनरवर आदळली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाची पुरती मोडतोड झाली आणि कारमध्ये बसलेले निशा, विशाल, सत्या, दिव्या, तसेच धीरज हे पाच जण जागीच ठार झाले तर, मैत्रेयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात इव्हाना हिचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. या अपघातातून बचावलेला एकमेव तरुण शाहबाज याच्यावर उपचार सुरू आहेत.
या मित्रमैत्रिणींनी गाडीत बसून काढलेला एक व्हिडिओ त्यांनी कालच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यात हे सर्व हसत खेळत, गाणी म्हणत जाताना दिसत आहेत.