अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 20:54 IST2019-03-12T20:53:57+5:302019-03-12T20:54:25+5:30

अनेकदा आगाऊमध्ये आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. २०१८ या एका वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी तिकिटे रद्द केली व यातून दीडशे कोटींहून अधिकचा महसूल रेल्वेला प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

Ohh! Revenue to Railways Rs 152 crores from canceled tickets | अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

ठळक मुद्देतत्काळमधून १४७ कोटी मिळाले : मध्य रेल्वेची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकदा आगाऊमध्ये आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. २०१८ या एका वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी तिकिटे रद्द केली व यातून दीडशे कोटींहून अधिकचा महसूल रेल्वेला प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहितीच्या अधिकारात मध्य रेल्वेकडे विचारणा केली होती. २०१८ मध्ये रेल्वेला किती महसूल प्राप्त झाला, तिकिटे रद्द केल्यामुळे मिळालेला महसूल, रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारणा केली होती. रेल्वेने अशा प्रवाशांकडून किती दंड वसूल केला, या कालावधीत किती भिक्षेकरी व तृतीयपंथींयांवर कारवाई झाली, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १ कोटी ४७ लाख ७४ हजार ६२३ लोकांनी तिकीट रद्द केले व त्यातून रेल्वेला १५२ कोटी २५ लाख ८४ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. याशिवाय तत्काळ तिकिटांमधून १४९ कोटी २९ लाख ६७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला. ‘प्रीमियम’ तिकिटांपोटी मध्य रेल्वेला ८३ कोटी ८३ लाख ७२ हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला. तर नागपूर विभागाला विविध माध्यमांतून २०१८ या वर्षात मध्य रेल्वेला ३६ कोटी ६९ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
रेल्वेकडून तृतीयपंथीयांवरील कारवाईचा वेग घटला
रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करताना तृतीयपंथीयांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. यातून वादाचेदेखील प्रसंग उद्भवतात. वादाच्या काही प्रसंगानंतर मध्य रेल्वेतर्फे तृतीयपंथीयांवरील कारवाईचा वेग वाढविण्यात आला होता. मात्र २०१८ मध्ये कारवाईचे प्रमाण घटले व वर्षभरात केवळ २४२ तृतीयपंथींयावर कारवाई करण्यात आली. मागील काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा घटला आहे. २०१८ मध्ये तृतीयपंथीयांकडून ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय १८ भिक्षेकऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली, तर अनधिकृत पार्किंगप्रकरणी ४३५ जणांवर कारवाई झाली.
विनातिकीट प्रवाशांकडून पावणेपाच कोटींचा दंड वसूल
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी मोहीम राबविण्यात येते. २०१८ मध्ये तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या ८७ हजार ६५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ४ कोटी ८७ लाख ७० हजार २८३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Ohh! Revenue to Railways Rs 152 crores from canceled tickets