नक्षलवाद्यांचे अस्तित्व १२६ जिल्ह्यांवरून उरले केवळ १८ जिल्ह्यांपुरता ! आत्मसमर्पणाचाच एकमेव पर्याय
By योगेश पांडे | Updated: October 15, 2025 12:55 IST2025-10-15T12:53:36+5:302025-10-15T12:55:14+5:30
Nagpur : सुरक्षा यंत्रणांचा नक्षल चळवळीवर वार; आत्मसमर्पणाचाच उरला पर्याय

Naxalites' presence reduced from 126 districts to only 18! Surrender is the only option
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने त्याच्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले व नक्षलवादी चळवळीला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. मागील काही वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी नक्षल चळवळीवर नियोजनबद्ध पद्धतीने वार करत कंबरडे मोडले आहे. अनेकांचा एन्काउंटर झाला असून, नाइलाजाने मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी यासाठी नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. देशभरात या वर्षभरात आत्मसमर्पणाचा आकडा चौदाशेहून अधिक गेला आहे.
मागील दहा वर्षात सुरक्षादलांनी विविध माध्यमांतून नक्षलवादी संघटनांची कोंडी केली आहे. त्यामुळेच त्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात घट होत आहे. १० वर्षांतच नक्षलवाद्यांचे अस्तित्व १२६ वरून केवळ १८ जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले आहे. या संघटनांवरदेखील जोरदार प्रहार करण्याची तयारी सुरू आहे. २०२४ मध्ये देशभरात २९० नक्षलवाद्यांना विविध चकमकींमध्ये ठार मारण्यात आले होते, तर १ हजार ९० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. या धास्तीतून ८८१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला होता. २०२३ मध्ये ३८० नक्षलवाद्यांचे एन्काउंटर झाले होते. १ हजार १९४ जणांना अटक झाली होती व १ हजार ४५ नक्षलवादी शरण आले होते. यंदा हा रेकॉर्ड मोडला गेला आहे. १० महिन्यातच चौदाशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
देशातील १८ जिल्ह्यांतच उरले अस्तित्व
नक्षलवाद्यांवर सातत्याने होत असलेल्या प्रहारामुळे अनेक बदल होत आहेत. २०१३ साली देशात १२६ जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचा प्रभाव किंवा सक्रियता होती. मात्र आता हे अस्तित्व केवळ १८ जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे.
नक्षलवाद्यांच्या फंडिंगवर प्रहार
नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी २०१५ साली राष्ट्रीय धोरण व कृती आराखडा निर्धारित करण्यात आला होता. सातत्याने नक्षलवाद्यांकडून हिंसाचार सुरू होता. सुरक्षा यंत्रणांनी सर्वांत अगोदर नक्षलवाद्यांच्या फंडिंगच्या मार्गावर प्रहार सुरू केला. यामुळे जंगलांमध्ये राहून चळवळीत काम करणे अनेकांसाठी अशक्य होऊ लागले. फंडिंगवर आलेला अंकुश आणि दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांना मिळालेला 'फ्री हॅण्ड' यामुळे कधीही एन्काउंटर होण्याची भीती असते. त्यातूनच भूपती व त्याच्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पणाचे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.