सावरकरांच्या भाषाप्रभुत्वाने मंतरलेले नागपूरचे भाषण
By Admin | Updated: May 28, 2014 01:05 IST2014-05-28T01:05:12+5:302014-05-28T01:05:12+5:30
पटवर्धन मैदान नागरिकांनी तुडुंब भरलेले..स्वा. सावरकर यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रत्येकाने कानात प्राण ओतलेले.. साल १९३९, हिंदू महासभेचे अधिवेशन.

सावरकरांच्या भाषाप्रभुत्वाने मंतरलेले नागपूरचे भाषण
आठवण ताजी : भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीबाबत सावरकरांचा आग्रह राजेश पाणूरकर -नागपूर पटवर्धन मैदान नागरिकांनी तुडुंब भरलेले..स्वा. सावरकर यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रत्येकाने कानात प्राण ओतलेले.. साल १९३९, हिंदू महासभेचे अधिवेशन. सावरकर प्रांगणात आले आणि अखंड हिंदुस्थानच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. सावरकर मंचावर आले.. सर्वांंनाच हात जोडून नमस्कार केला.. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. नागपूरला या अधिवेशनात त्यांनी केलेले भाषण प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग निर्माण करणारे ठरले. सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीपूर्ण आणि आवेशपूर्ण भाषणाने अख्खे पटवर्धन मैदान मंतरले गेले. सावरकर फर्डे वक्ते होते. एखादा मुद्दा नेमकेपणाने आणि तितक्याच तीव्रतेने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यात ते भाषाप्रभू. भाषा लवचिकपणे वाकवित भावनिक आवाहन करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीतच. ही सभा सावरकरांनी आपल्या शब्दांनी जिंकली होती. नागपुरात हिंदी आणि मराठी भाषिक लोक त्याकाळी मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळेच सावरकरांनी भाषणाच्या प्रारंभीच सांगा..कुठल्या भाषेत भाषण करायचे? असा प्रश्न केला आणि हिंदी, इंग्रजी, मराठी अशा तीनही भाषांमधून त्यांना भाषणाचा आग्रह करण्यात आला. सावरकरांनीही तीनही भाषांत भाषण करताना आपल्या वक्तृत्वाने उपस्थितांना बांधून ठेवले. आज २८ मे. सावरकरांची जयंती. यानिमित्ताने त्यांचे नागपूरशी असलेले ऋणानुबंध शोधण्याचा प्रयत्न केला. हिंदू महासभेच्या अधिवेशनासाठी सावरकर नागपुरात आले तेव्हा त्यांनी मोठी रॅली काढली होती. महालच्या चिटणीस पार्क पासून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी प्रचंड गर्दीने नागपूरची वाहतूक दिवसभर खोळंबली होती. आजही त्यांचे अनेक चाहते, अभ्यासक आणि अनुयायी नागपुरात आहेत. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे जवळचे संबंध होते. किंबहुना सावरकरांच्या प्रेरणेतूनच अनेक संघटनांचा जन्म झाला. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करणारी असावी, हा सावरकरांचा विचार त्यामागे होता. नागपुरात आले असताना अशा संघटनांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जडणघडण पाहून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. नागपूर विद्यापीठान दिली डी.लिट. १४ ऑगस्ट १९४३ साली नागपूर विद्यापीठाने त्यांना डी.लिट. या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले होते. याप्रसंगी पदवी घेतल्यावर सावरकरांनी दीक्षांत समारोहात छोटेखानी भाषण केले. त्यानंतर अनेकांच्या आग्रहाखातर विद्यापीठात त्यांच्या ‘भाषाशुद्धी व लिपीशुद्धी’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान देताना त्यांनी भाषेचे महत्त्व सोदाहरण समजावून सांगताना फळ्यावर खडूने अनेक उदाहरणे समजावून सांगितली, असा उल्लेख श्रीधर वर्णेकर यांच्या ग्रंथातील एका लेखात आहे. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युवकांच्या मनात स्थान मिळविले होते. रेशीमबागेत संघस्थानावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन झाले. या व्याख्यानात त्यांनी युवकांच्या सळसळत्या रक्ताला केलेल्या आवाहनाने युवक स्वातंत्र्यासाठी पेटून उठले. या व्याख्यानात त्यांनी गुरुगोविंदसिंग यांच्या वचनाने युवकांची मने जिंकली, अशी आठवण हिंदू महासभेचे पद्मश्री तांबेकर आणि विरेंद्र देशपांडे यांनी सांगितली. सावरकर स्मारक समितीची स्थापना सावरकरांवर प्रेम करणार्या त्यांच्या चाहत्यांनी १९८0 साली सावरकर स्मारक समितीची स्थापना नागपुरात केली. या समितीच्या पुढाकारानेच २५ मे १९८३ साली शंकरनगर चौकात स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. वि. र. पुंडलिक, तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस, प्रा. प्रमोद सोवनी, भाई भगवंतराव गायकवाड, तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विक्रमराव सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते, अशी आठवण स्मारक समितीचे अजय कुळकर्णी यांनी सांगितली. सावरकरांचा नागपूरशी ऋणानुबंध ४स्वा. सावरकरांचा नागपूरशी जवळचा ऋणानुबंध होता. १९३६ साली रत्नागिरीहून कारागृहातून सुटल्यावर ते थेट पहिल्यांदा नागपुरात आले होते. त्यावेळी सुविख्यात विधीज्ञ बोबडे यांच्या निवासस्थानी ते थांबले. त्याकाळात फोर्ड कारने धर्मवीर, मुंजे, विश्वनाथराव केळकर यांच्यासह त्यांनी नागपूरचा फेरफटका मारून अनेक कार्यकर्त्यांंच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती त्यांच्या प्रभावात कायम राहायची, असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यानंतर सायंकाळी चिटणीस पार्क येथे त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या सभेला ध्वनिक्षेपकच नव्हता. दै. महाराष्ट्रचे संस्थापक दादासाहेब ओगले यांनी या सभेचे प्रास्ताविक केले. त्यानंतर ध्वनिक्षेपकाशिवाय सावरकरांनी तब्बल दीड तास व्याख्यान दिले पण हजारोंच्या सभेत एकही नागरिक हलला नाही. अन् सावरकरांच्या डोळ्यात अश्रू तरळले सावरकरांचे चाहते त्यांच्यासाठी वेडे होते. सावरकर जे म्हणतील ते प्राणपणाने करण्यासाठी त्यांचे चाहते काहीही करवयास तयार होत. सावरकर नागपुरात जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्या गळ्यात पहिला पुष्पहार टाकण्याचा प्रघात वा.ना. मावकर यांनी घातला होता. सावरकरांच्या नागपूर आगमनप्रसंगी पहिला हार तेच घालायचे. एकदा सावरकर नागपुरात आले असताना रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाली. पहिला हार सावरकरांना घालण्याच्या प्रयत्नात मावकर रेल्वेखाली आले आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सावरकरांना या घटनेने धक्का बसला. त्यानंतर सावरकर नागपुरातच दोन दिवस थांबले. मावकर यांच्या अंत्यविधीत ते उपस्थित राहिले. मावकर यांच्या मृत्यूने त्यांचे डोळे डबडबले, असे स्मारक समितीचे सदस्य चंद्रकांत लाखे यांनी सांगितले.