नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषद निवडणुकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:38 IST2019-07-03T22:37:49+5:302019-07-03T22:38:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थी संघटनांकडून याचा विरोध होत आहे. या निवडणुका पूर्णत: खुल्या स्वरूपाच्या नसल्याचा आरोप करत ‘एनएसयूआय’ने निवडणूक प्रणालीचा विरोध केला आहे.

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषद निवडणुकांचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थी संघटनांकडून याचा विरोध होत आहे. या निवडणुका पूर्णत: खुल्या स्वरूपाच्या नसल्याचा आरोप करत ‘एनएसयूआय’ने निवडणूक प्रणालीचा विरोध केला आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये १९९४ मध्ये नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला होता. तोपर्यंत सर्वसाधारण निवडणुकांप्रमाणेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका व्हायच्या. मात्र निवडणुकांतील हिंसा लक्षात घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी परिषद गठित करण्याची प्रणाली सुरू करण्यात आली. १९९६ साली यानुसार सर्वप्रथम निवडणुका झाल्या होत्या. विद्यापीठाशी जुळलेल्या विद्यार्थी संघटनांनी याचा जोरदार विरोध केला होता. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार आता परत खुल्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभारी कुलसचिव डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची ६ जुलै रोजी बैठक बोलविली आहे.
मात्र ‘एनएसयूआय’ने निवडणुकीला विरोध केला आहे. या निवडणुका पूर्णत: खुल्या स्वरूपाच्या करण्यात याव्या, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी विकास संचालक डॉ.अभय मुद्गल यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे, राष्ट्रीय प्रतिनिधी आमीर नूरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजित सिंह, ’एनएसयूआय’चे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक सिंह, महासचिव प्रतीक कोल्हे, प्रणय ठाकूर, दादा भोयर उपस्थित होते.
हे आहेत आक्षेप
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांत विद्यार्थी आपल्या मताचा उपयोग करून महाविद्यालय व विद्यापीठात आपला प्रतिनिधी निवडतो. मात्र नागपूर विद्यापीठाच्या दिशानिर्देशांनुसार विद्यार्थी केवळ महाविद्यालयाचाच प्रतिनिधी निवडू शकतो. महाविद्यालयाच्या प्रतिनिधीलाच विद्यापीठाचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मात्र खुल्या निवडणुकांत विद्यार्थ्यांना हा अधिकार का नाही, असा आक्षेप ‘एनएसयूआय’ने घेतला आहे.