नागपूर मेट्रोचा महावितरणला ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:17 IST2018-04-06T21:46:09+5:302018-04-06T23:17:20+5:30
नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार आणि उकाड्यामुळे वीजग्राहक मेटाकुटीस आले आहेत.

नागपूर मेट्रोचा महावितरणला ताप !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार आणि उकाड्यामुळे वीजग्राहक मेटाकुटीस आले आहेत.
गुरुवारी रात्री भारतीय खाद्य निगम परिसरास वीज पुरवठा करण्याऱ्या भूमिगत वाहिनीला अजनी चौक येथे मेट्रो आणि ओसीडब्ल्यूच्या खोदकामांचे वेळी तडा बसल्याने सुमारे अडीच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री ८ वाजता खंडित झाला. रात्रीची वेळ असल्याने बिघाड दुरुस्त करणे शक्य नसल्याने पर्यायी मार्गाने वीज पुरवठा घेऊन ग्राहकांना त्वरित दिलासा देण्यात आला होता, या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी पहाटे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात येऊन सकाळी १० वाजेपर्यंत येथील वीज पुरवठा नियमित वाहिनीवर स्थानांतरित करण्यात आला.
याशिवाय शुक्रवारी मुंजे चौकात पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास परत एकदा मेट्रोच्या खोदकामाचा फटका महावितरणच्या भूमिगत वीज वाहिनीला बसला. बिघाडाची माहिती मिळताच बर्डी शाखा कार्यालयाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि पहाटेच तेथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
काँग्रेसनगर विभागात बहुतांश वीज यंत्रणा भूमिगत
महावितरणच्या काँग्रेसनगर विभागात महावितरणची बहुतांश वीज वितरण यंत्रणा ही भूमिगत आहे, या यंत्रणेचा नकाशाही महावितरणकडे उपलब्ध आहे, यामुळे खोदकाम करतेवेळी महावितरणला पूर्वसूचना दिल्यास वीज वितरण यंत्रणेचे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे. अशा खोदकामांमुळे महावितरणच्या भूमिगत उच्चदाब वाहिनीचे नुकसान झाल्यास वीजपुरवठा सुरळीत करणे क्लेशदायक असते, व त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसतो. यामुळे ग्राहकांमध्ये महावितरणविरोधात रोषही निर्माण होतो, हे सर्व टाळण्यासाठी विकास कार्याकरिता खोदकाम करणाºया प्रत्येक संस्थेने एकमेकांशी समन्वय साधल्यास त्याचा कुणाला त्रास होणार नाही, किंबहुना संबंधित कामही सहजतेने होईल.