नागपुरात सासरचा त्रास असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:46 IST2020-06-27T19:45:13+5:302020-06-27T19:46:38+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरची मंडळीही छळत असल्यामुळे विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. परिणामी कपिलनगर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नागपुरात सासरचा त्रास असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासरची मंडळीही छळत असल्यामुळे विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. परिणामी कपिलनगर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सायली विलास निकोसे (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानवनगरात राहणाºया आरोपी विलास भीमराव निकोसे याच्यासोबत सायलीचा २ एप्रिल २०१७ रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या चार महिन्यानंतर पती विलास, सासू सविता आणि सासरे भीमराव हे तिघे सायलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागले. तीन वर्षापासून सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर सायलीने १५ जूनला सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. फिर्यादी दिलीप बाबूरावजी रामटेके यांनी सायलीच्या आत्महत्येला तिचा पती आणि सासू-सासरे कारणीभूत असल्याची तक्रार नोंदविली. त्यावरून कपिलनगर पोलिसांनी सायलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पती तसेच सासू-सासऱ्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.