लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईनंतर गुजरातकडे सरकलेल्या तौत्के चक्रीवादळाचे पडसाद नागपुरातील आणि विदर्भातील वातावरणात उमटले. हवामान विभागाने वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी तो चुकला. मात्र दिवसभर विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात वातावरण ढगाळलेले होते. वातावरणात दमटपणा असल्याने पारा खालावूनही उकाड्याने सारेच त्रस्त होते.
सोमवारी नागपुरात ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत आकाश ढगाळलेलेच होते. सकाळी वातावरण थंड होते. सकाळची आर्द्रता ७६ नोंदविण्यात आली तर सायंकाळी ती घटून ५८ वर आली. दिवसभर उन-सावलीचा खेळ सुरू असला तरी वातावरणातील दमटपणामुळे उकाडा असहाय्य होत होता.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सोमवारी पारा खालावलेला होता. अमरावतीमध्ये सर्वात कमी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर ३७, चंद्रपूर ३७.२, वर्धा ३७.५, गडचिरोली ३७.६, बुलढाणा ३७.७, गोंदीया ३७.८,
यवतमाळ ३८.५ आणि अकोला येथे ३८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
रविवारी सायंकाळी आणि रात्री विदर्भात काही प्रमाणात पाऊस झाला. नागपुरात मागील २४ तासात ०.७ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला ०.६, अमरावती ७.४, गडचिरोली ०.६, वर्धा ०.८ तर वाशिम येथे सर्वाधिक १९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. या पावसामुळेमुळे सोमवारी दिवसभर वातावरण प्रचंड दमट झाले होते.
हवामान विभागाने सोमवारी नागपूर जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तासी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत विजेच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, सायंकाळपर्यंत नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात पावसाचे आगमन झालेले नव्हते. मंगळवारी १८ मे साठीही हवामान विभागाने असाच अंदाज वर्तविला आहे.