"धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा; अन्यथा कंपनीला ‘टर्मिनेट’ करू", नितीन गडकरी यांनी दिला इशारा
By मोरेश्वर मानापुरे | Updated: December 23, 2024 15:46 IST2024-12-23T15:45:53+5:302024-12-23T15:46:17+5:30
Nagpur News: धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.

"धावपट्टीचे काम एक महिन्यात पूर्ण करा; अन्यथा कंपनीला ‘टर्मिनेट’ करू", नितीन गडकरी यांनी दिला इशारा
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामाला उशीर होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धावपट्टीच्या रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करा, अन्यथा कंपनीला टर्मिनेट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. प्रसंगी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करू आणि रिकार्पेटिंगचे काम दुसऱ्या कंपनीला देण्याचा इशारा गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना दिला.
धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या कामाला उशीर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नितीन गडकरी यांनी सोमवारी धावपट्टीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आ. मोहन मते, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य गिरधारी मंत्री, प्रकाश भोयर, दिलीप जाधव, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे, आणि के.जी. गुप्ता कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळी १० ते ६ वेळेत विमानाची ये-जा बंद; तिकिटांचे दर तिपटीने वाढले
गडकरी म्हणाले, डिसेंबर २०२३ मध्ये विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीच्या रिकार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध केली. १ मे २०२४ रोजी के. जी. गुप्ता कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले. मात्र, अद्याप धावपट्टीचे काम पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या. शिवाय, धावपट्टीच्या कामामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नागपूर विमातळावरील आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढले. याचा नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना त्रास होत आहे.
कंपनी म्हणते १ मेपर्यंत काम पूर्ण करू
कार्यादेश मिळाल्यावर कंपनीने जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दरम्यान काही कारणांनी काम बंद होते. त्यानंतर २४ नोव्हेंबरपासून काम पुन्हा सुरू झाले. पहिल्या लेअरचे काम ८० टक्के, दुसऱ्या आणि तिसऱ्या लेअरचे काम २१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
पाच महिने सोसावे लागेल तिकिटांची दरवाढ
गडकरी म्हणाले, नागरिकांना आणखी पाच महिने विमान प्रवासाची भाडेवाढ सोसावी लागेल. हे योग्य नाही. कंपनीने एक महिन्याच्या आत धावपट्टीचे काम पूर्ण करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
हॉटमिक्स प्रकल्प ८ किमी दूर, आठ रोलरने काम करा
गडकरी म्हणाले, कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प कामाच्या ठिकाणापासून ८ किमी दूर लावला आहे. त्या ठिकाणाहून प्रकल्पस्थळी मटेरियल आणण्यासाठी बराच वेळ लागतो. परिणामी कामाला उशीर होतो. कंपनीने हॉटमिक्स प्रकल्प जवळच उभारावा. कंपनी तीन रोलरने काम करीत आहे. कंपनीने प्रारंभीपासूनच सात ते आठ रोलरने काम केले असते तर बरेच काम झाले असते. कंपनीच्या इंदुर येथील कंत्राटदारांशी बोलणे झाले असून तातडीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.