आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश
By योगेश पांडे | Updated: May 27, 2025 23:54 IST2025-05-27T23:53:58+5:302025-05-27T23:54:51+5:30
२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश
योगेश पांडे
नागपूर : मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागात नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केल्याचा आरोप जोशी यांनी लावला होता. संबंधित प्रकरण हे वर्तमान मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकाळातील नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राठोड यांनाच या प्रकरणाची सविस्तर चौकशीचे निर्देश दिले आहेत.
२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. यादी निश्चित झाल्यावर पाच वर्षांनंतर आठ संबंधित अधिकाऱ्यांचे नाव जलसंपदा विभागातून काढून मृद व जलसंधारण विभागात टाकण्यात आले. यावरच जोशी यांनी आक्षेप घेतला आहे.
या प्रकारामुळे पावणे चारशेच्या जवळपास लोकांच्या आस्थापनेत गडबड झाली. या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली होती. जोशी यांच्या पत्रातील तारखांच्या वेळी माझ्याकडे हे मंत्रीपद नव्हतेच. मी जुलै २०२३ मध्ये मंत्री झालो. हे प्रकरण गंभीर आहे व मुख्यमंत्र्यांनी मलाच या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे संजय राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.