एमआयएमचा महाविकास आघाडीला सोमवारपर्यंत ‘अल्टिमेटम’
By आनंद डेकाटे | Updated: September 7, 2024 18:04 IST2024-09-07T18:03:56+5:302024-09-07T18:04:42+5:30
इम्तियाज जलील : महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्याच भ्रमात

MIM's 'ultimatum' to Mahavikas Aghadi till Monday
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एमआयएमने महाविकास आघाडीला युतीबाबतचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर चर्चाही झाली. परंतु, आघाडीच्या नेत्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे येत्या ९ सप्टेंबरपर्यंत महाविकास आघाडीने निर्णय जाहीर करावा, असा ‘अल्टिमेटम’ एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी येथे पत्रपरिषदेत दिला. सोमवारी पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी हे संभाजीनगर येथे येत आहेत. त्यावेळी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएमच्या विदर्भ महिला कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. इम्तियाज जलील म्हणाले, आमच्या पक्षाची जितकी ताकद आहे, तितक्याच जागा आम्ही मागणार आहोत. अद्यापही जागांबाबत चर्चा झालेली नाही. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे, त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला आहे.
परंतु एमआयएमची राजकीय ताकद नाही, असा संदेश कदाचित ते देऊ इच्छितात. महाविकास आघाडीचे नेते अजूनही लोकसभा निवडणुकीच्याच भ्रमात आहेत. मात्र हा भ्रम विधानसभा निवडणुकीत तुटेल, असा दावाही त्यांनी केला.
रामगिरी महाराजांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या, त्यांच्या जिवाला धोका
रामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ. नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे. त्यामुळे ते दोघेही मुस्लीमांविरोधात उघडपणे वक्तव्य करीत आहेत. भाजपचे सरकार सत्तेत येण्यासाठी ते काहीही करू शकतात. रामगिरी महाराज यांच्या जिवाला धोका आहे. त्यांची हत्या करून मुस्लीमांना बदनाम केले जाऊ शकते, असा आरोप करीत रामगिरी महाराज यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली.