‘मी धरा वसुंधरा...’ संगीतमय नजराणा स्वरसाधनातर्फे आयोजन
By Admin | Updated: May 12, 2014 01:02 IST2014-05-12T01:02:03+5:302014-05-12T01:02:03+5:30
स्वरसाधना संस्थेच्यावतीने जागतिक मातृदिनानिमित्त रविवारी सकल सजीव सृष्टीचे संवर्धन करणार्या वसुंधरेप्रति कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्या ‘मी धरा वसुंधरा...’

‘मी धरा वसुंधरा...’ संगीतमय नजराणा स्वरसाधनातर्फे आयोजन
: पर्यावरण रक्षणाचा संदेश
नागपूर : स्वरसाधना संस्थेच्यावतीने जागतिक मातृदिनानिमित्त रविवारी सकल सजीव सृष्टीचे संवर्धन करणार्या वसुंधरेप्रति कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्या ‘मी धरा वसुंधरा...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संयोजक चैतन्य मोहाडीकर यांची होती. यावेळी पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह सुचित्रा कातरकर रचित रचनांचे संगीतमय सादरीकरणही झाले. या गीत सादरीकरणाच्या समवेत प्रतिभावान चित्रकार नाना मिसाळ यांनी कलात्मकतेने रेखाटलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विजय घुसे, डॉ. विरल कामदार, डॉ. राजकुमार खापेकर, ज्येष्ठ पत्रकार श्याम पात्रीकर, ग्राहक मंचाच्या डॉ. कल्पना उपाध्याय, विद्या लुले, सुचित्रा कातरकर व स्वरसाधना संस्थेचे कार्याध्यक्ष संजय चिंचोळे उपस्थित होते. सुरुवातीला स्वरसाधना संस्थेचे शिल्पकार पं. प्रभाकर देशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आलाप संगीतच्या संचालिका अंजली निसळ यांनी पं. देशकरांबद्दल भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. दरम्यान डॉ. विजय घुसे यांनी सजीव सृष्टी ज्या पंचमहाभूतांवर टिकून आहे, त्याच्या रक्षणाची अनिवार्यता विषद करून, पाणी,जमीन व जंगलाच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. अजय पाटील यांनी ग्लोबल वार्मिंगचा वाढता धोका लक्षात घेऊ न पृथ्वीच्या रक्षणाचे आवाहन केले. शिवाय या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्राहक मंचाच्या ‘वसुंधरा’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. यानंतर सुचित्रा कातरकर रचित स्वरांकित रचनांच्या सुमधूर कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यात सुचित्रा कातरकरांसह श्याम देशपांडे, विजय देशपांडे, पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, छाया सरोदे, साक्षी सरोदे, जान्हवी हरिदास, कैवल्य केजकर, साक्षात कट्यारमल यांनी भाग घेतला होता. दरम्यान ‘निसर्ग पूजन..., रंगबावरी झाले रे मी.., डोळे झाले ग पाखरू..., दिस पावसाचे आले..., ये मोगरा फुलून..’ अशी २० पेक्षा अधिक निसर्ग गीते गायली. प्रभा देऊ स्कर यांनी निवेदन केले. विनय ढोक, गोविंद गडीकर, विजय देशपांडे, सुधीर गोसावी, गजानन रानडे यांनी वाद्यावर साथ दिली. (प्रतिनिधी)