महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 20:29 IST2019-02-14T20:27:51+5:302019-02-14T20:29:16+5:30
महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानाईत यांनी स्वीकारला.

महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानाईत यांनी स्वीकारला.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय रेशीम बोर्डच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय रेशीम बोर्डचे अध्यक्ष हनमंत रायप्पा, वस्त्र मंत्रालयाचे सचिव राघवेंद्र सिंग, रेशीम बोर्डचे सदस्य सचिव ओखंडियार, एस.सी. पांडे, विशेष वित्त सचिव मंचावर उपस्थित होते. वस्त्रोद्योग मंत्रालयाने टसर धागा काढण्याचे तंत्र विकसित केले असून प्रातनिधिक स्वरूपात सहा राज्यातील महिलांना या मशीनचे वितरण करण्यात आले.
जगभर रेशीम वस्त्रे पोहचविण्यासाठी सहकार्य : सुषमा स्वराज
रेशीम धाग्यात इतकी क्षमता आहे की, जागतिक बाजारपेठ आजही सहज उपलब्ध होईल. भारत देश जगात रेशीम वस्त्रे आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. जगात रेशीम वस्त्रांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आवश्यक सर्व सहकार्य देईल, असे आश्वासन सुषमा स्वराज यांनी दिले.
महिलांना शारीरिक त्रासापासून मुक्तता मिळेल : स्मृती इराणी
महाराष्ट्रात रेशीम हा अपरपंरागत व्यवसाय असतानाही महाराष्ट्र रेशीम शेती उद्योगात अतुलनीय योगदान देत आहे. त्यामुळेच राज्याला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. टसर धागा काढण्यासाठी महिलांना जांघांचा वापर करावा लागतो. वर्ष २०२० पर्यंत या शारीरिक त्रासापासून भारतातील सर्वच महिलांना मुक्तता मिळणार असल्याची घोषणा इराणी यांनी केली.
रेशीम शेती उद्योग वाढीसाठी राज्य शासन प्रयत्नशील : बानाईत
रेशीम शेती उद्योग वाढीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्याचा परिपाक म्हणून हा पुरस्कार राज्याला मिळाला. शासनाने रेशीम शेती उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी नावीण्यपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत. रेशीम शेती उद्योगाला पूर्ण कृषी दर्जा मिळण्यासाठी समिती नेमली असून यामध्ये तज्ज्ञ, कृषी विद्यापीठातील कुलगुरू, अनुभवी अधिकारी यांचा समावेश असून येत्या काही दिवसात प्रस्ताव मंत्रालयाकडे मांडण्यात येणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास इतर शेतकऱ्यांना मिळणारे सर्वच लाभ रेशीम शेती करणाºयांनाही मिळतील. हा पुरस्कार सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे.