Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:54 IST2019-09-27T19:51:56+5:302019-09-27T19:54:13+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले.

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. सर्वाधिक ३३ उमेदवारी अर्ज उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून नेण्यात आले तर सर्वात कमी ३ अर्ज उमरेड विधानसभा मतदार संघातून गेले.
विधानसभा निवडणुकीला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. निवडणूक अर्ज वितरित करणे आणि वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात असलेल्या शहरातील विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विभागीय कार्यालयात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एक उमेदवाराला चार अर्ज नेता येतात. पहिल्या दिवशी नागपूर शहरातील ११६ अर्ज गेले तर ग्रामीण भागातून ६० अर्ज गेले. परंतु एकानेही अर्ज दाखल केला नाही. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.
नागपूर दक्षिण-पश्चिम - १५
नागपूर दक्षिण : २३
नागपूर पश्चिम : १५
नागपूर पूर्व : १०
नागपूर मध्य : २०
उत्तर नागपूर : ३३
कामठी : ७
हिंगणा : १३
उमरेड : ३
काटोल : १०
सावनेर : ९
रामटेक : १८
-----------------------
एकूण १७६
जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथककडून जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप आले आहे.
दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ४ ऑक्टोबर ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. ४ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ५ तारखेला अर्जाची छाननी होईल. ७ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होईल.