समाज व कृषी क्षेत्राच्या समन्वयाने ‘महाबिजोत्सव’ व्हावा

By आनंद डेकाटे | Published: April 27, 2024 05:10 PM2024-04-27T17:10:48+5:302024-04-27T17:13:11+5:30

प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा : राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

'Mahabijotsav' should be done in coordination with society and agriculture sector | समाज व कृषी क्षेत्राच्या समन्वयाने ‘महाबिजोत्सव’ व्हावा

National Seed Festival 2024

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबिजोत्सव व्हावा, अशी भावना प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.


वनामती, आत्मा आणि बिजोत्सव समुह यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती परीसरात तीन दिवसीय राष्ट्रीय बीज महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, बिजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे यावेळी उपस्थित होते.
यावेळी शर्मा यांनी शेतीसाठी बियाण्यांचे महत्त्व विषद करतांना शुद्ध बियाण्यांसोबतच पाणी, हवा आणि माती हे घटक शुध्द व चिरंतण ठेवण्याचे आवाहन सद्य:स्थितीत असल्याचे सांगितले. हे आवाहन पेलण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची जबाबदारी समजून योगदान देण्याची व कृषी क्षेत्राचा उत्तम समन्वय ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. या समन्वयातून देशात ठिकठिकाणी महाबिजोत्सवाचे आयोजन होवून सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी मित्ताली सेठी म्हणाल्या, आपल्या आवतीभवती शेतीत वेग-वेगळे संशोधन, नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी वनामती संस्थेसमोर आपल्या संकल्पना मांडाव्यात त्या जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्था पुढाकार घेईल. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेतीतील नवनवीन प्रयोग व संशोधनाला सर्वदूर पोहचविणे, संशोधन व्यवस्थापन, जीआयएस, कृषी उत्पादक शेतकरी आदी घटकांना एकत्र आणून यास चळवळीचे स्वरुप देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. रविंद्र मनोहरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना कडू यांनी प्रस्ताविक केले. कीर्ती मंगरुळकर यांनी संचालन केले तर प्राची माहुरकर यांनी आभार मानले.


- १८ राज्यातील बीज उत्पादक शेतकरी सहभागी
२९ एप्रिलपर्यंत बीज महोत्सव चालणार आहे. यात परंपरागत बियाण्यांचे प्रदर्शन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतमाल प्रदर्शन व विक्री, भरडधान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम होत आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्रपदेश, तामिळनाडू आदी १८ राज्यातील बीज उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

Web Title: 'Mahabijotsav' should be done in coordination with society and agriculture sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.