विवाहितेस जाळून पाहत बसणाऱ्या पती, सासऱ्याची जन्मठेप कायम; चारित्र्याच्या संशयावर केला होता घात
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 7, 2026 17:15 IST2026-03-07T17:14:45+5:302026-03-07T17:15:29+5:30
Nagpur : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला लग्नानंतर तीन वर्षातच जाळणाऱ्या व तिच्याकडे गप्पपणे पाहत बसलेल्या पती व सासऱ्याला कर्माची फळे भोगावी लागणार आहेत.

Life imprisonment for husband, father-in-law who watched as wife was burnt alive; Murder was committed on suspicion of character
राकेश घानोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला लग्नानंतर तीन वर्षातच जाळणाऱ्या व तिच्याकडे गप्पपणे पाहत बसलेल्या पती व सासऱ्याला कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. मुंबईउच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने घटनेची क्रूरता व पुरावे विचारात घेता दोघांचीही जन्मठेपेसह इतर शिक्षा कायम ठेवली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
अमोल देशमुख (वय २८) व विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून, ते पोफळी, ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. विवाहितेचे नाव छाया होते. तिचे २००९ मध्ये अमोलसोबत लग्न झाले होते. दरम्यान, दोन वर्षापर्यंत आरोपींनी छायाला चांगले वागवले. त्यानंतर छायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी तिचा छळ करायला लागले.
आरोपींनी १५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ११ च्या सुमारास छायाची हत्या करण्यासाठी आधी तिला बेदम मारहाण केली. तिचा गळा दाबला आणि त्यानंतर रॉकेल टाकून आग लावली आणि तिला जळताना पाहत बसले. छायाने स्वतःला वाचविण्यासाठी प्रतिकार केला होता. त्यामुळे आरोपींचे कपडेही रॉकेलने ओले झाले होते.
हत्येच्या गुन्ह्याकरिता दोषी
सत्र न्यायालयाने २ मार्च २०२१ रोजी दोन्ही आरोपींना हत्येच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून जन्मठेप व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल पानसरे व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयानेही आरोपी दोषी असल्याचा निर्णय देऊन अपील फेटाळून लावले.