नागपुरात खंडणीसाठी अपहरण : महिलेने जाळ्यात ओढून निर्जन ठिकाणी नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:51 PM2019-07-25T22:51:57+5:302019-07-25T22:54:09+5:30

मदतीच्या नावाखाली एका व्यक्तीला जवळ बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि नंतर त्याला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीमध्ये तीन महिला आरोपींचा समावेश आहे.

Kidnapping for ransom in Nagpur: A woman is dragged into a net and taken to a deserted place | नागपुरात खंडणीसाठी अपहरण : महिलेने जाळ्यात ओढून निर्जन ठिकाणी नेले

नागपुरात खंडणीसाठी अपहरण : महिलेने जाळ्यात ओढून निर्जन ठिकाणी नेले

Next
ठळक मुद्देसाथीदारांच्या मदतीने कृत्य : पाचपावलीतील घटना, टोळी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मदतीच्या नावाखाली एका व्यक्तीला जवळ बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि नंतर त्याला एक लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीमध्ये तीन महिला आरोपींचा समावेश असून सोमू दीपक चक्रधर (वय २९, रा. बाळाभाऊपेठ), रसिका राजीव घाटे (वय २१, रा. लष्करीबाग), रंजना विलास पराते (वय २४, रा. नाईक तलाव बांगलादेश), संग्राम ऊर्फ राजा आलोक पाठक (वय २२, रा. मेहंदीबाग), गौरव सूर्यकांत ढवळे (वय ३०, रा. दहीबाजार, इतवारी) आणि गणेश दशरथ निनावे (वय २५, रा. बिनाकी मंगळवारी) अशी आरोपींची नावे आहेत.
कळमन्यातील विजयनगरात संजय चंदू शाहू (वय २६) राहतो. तो सेंट्रींगचा कंत्राटदार आहे. त्याला २२ जुलैला सायंकाळी ५.३० च्या सुमारास रंजना परातेने फोन केला. आपण विधवा असून, मला मदतीची गरज आहे, असे सांगून तिने संजयला कमाल चौकात भेटायला बोलविले. संजय तेथे पोहचला. रंजनाने त्याला आपल्या जाळ्यात अडकविले. चहा घेतल्यानंतर त्याला सीताबर्डीत सोडून देण्याची विनंती केली. दुचाकीने बर्डीत आल्यानंतर अंबाझरीकडे फिरायला जाऊ म्हणत त्याला तिकडे नेले. तेथून वडधामणा आणि नंतर चोखरदानीकडे नेले. एव्हाना रात्रीची वेळ झाली होती. रंजना स्वत:हूनच त्याला निर्जन ठिकाणी फिरायला चलण्यास बाध्य करीत असल्याने संजयही मनोमन मोहरला होता. दरम्यान आईचा फोन आला असे सांगून तिने संजयला दुचाकी थांबवण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक तवेरा आली आणि त्यातून उतरलेल्या आरोपींनी संजयला जबरदस्तीने आपल्या वाहनात कोंबले. त्याला बेदम मारहाण केली. आमच्या नात्यातील महिलेला एवढ्या रात्री कलुषित इराद्याने इकडे घेऊन आला, असा आरोप लावत त्यांनी संजयला बदनामीचा धाक दाखवत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. आपण आरोपींच्या कटकारस्थानात अडकल्याचे लक्षात आल्याने संजयने मित्राकडून रक्कम मागवतो, असे सांगत आरोपींना अग्रसेन चौकाजवळ घेऊन चलण्यास सांगितले. त्यानुसार, आरोपी संजयला घेऊन मध्यरात्री अग्रेसन चौकात आले.

मित्र आणि पोलिसांचे प्रसंगावधान
संजयचे अपहरण झाले आणि त्याच्या जीवाला धोका आहे, हे फोनवरून लक्षात आल्यामुळे संजयच्या मित्राने लगेच पाचपावली पोलिसांना माहिती कळविली. अपहरण करून एक लाखाची खंडणी मागितली गेल्याची माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे पोलीस उपनिरीक्षक गोडबोले, उपनिरीक्षक रामटेके तसेच कर्मचारी विजय यादव, राजेश देशमुख, अनिरुद्ध मेश्राम, चिंतामण डाखोरे, सुरेखा, महेश जाधव, विनोद गायकवाड, रवी मिश्रा, विजय जाने आणि शिपाई सुमित यांनी सापळा रचला.

पोलीस बनले मेट्रोचे कर्मचारी
पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून जाऊ शकतात, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी डागा हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरील कर्मचाऱ्यांना मेट्रोचे जॅकेट आणि हेल्मेट मागितले. ते घालून पोलिसांनी आरोपींच्या वाहनाला गराडा घातला आणि त्यांना पकडून संजयची सुटका केली.

 

Web Title: Kidnapping for ransom in Nagpur: A woman is dragged into a net and taken to a deserted place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.