सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या
By Admin | Updated: August 19, 2016 02:49 IST2016-08-19T02:49:51+5:302016-08-19T02:49:51+5:30
रक्षाबंधननिमित्त लोकमत सखी मंचच्यावतीने कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या
सखी मंचचा उपक्रम : कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रात रक्षाबंधन
कामठी : रक्षाबंधननिमित्त लोकमत सखी मंचच्यावतीने कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखींनी सैनिक बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
सैनिक प्रशिक्षण केंद्रातील लेफ्टनंट कर्नल एस. के. सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुभेदार मेजर संतबिरसिंह, सुभेदार लक्ष्मण जाधव, सुभेदार दादा जाधव, नायब सुभेदार विलास येलूरकर, जगवीरसिंह, संताजी शेंडे, नरेंद्र सिंह, विनोदजी यांच्यासह सैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या नेतृत्वात कामठीच्या संयोजिका नीतू बांते, मंगला कारेमोरे व सखींनी सैनिक बांधवांना परंपरागत पद्धतीने ओवाळून राख्या बांधल्या. या प्रसंगामुळे घरापासून दूर राहणारे सैनिक बांधव भारावून गेले होते.
‘आम्ही देशसेवा करीत आहोत. आज सखींनी राखी बांधल्याने आम्ही रक्षाबंधन हा सण कुटुंबीयांसोबत साजरा करीत आहोत, अशा प्रतिक्रिया सैनिकांनी व्यक्त केल्या. राजस्थानातील सुभेदार नरेंद्र सिंह म्हणाले, मी सैन्यदलात भरती झालो तेव्हापासून आज प्रथमच सैनिक क्षेत्रात रक्षाबंधनानिमित्त राखी बांधत आहे. सखींनी राखी बांधल्याने आपण भारावून गेलो आहे.’ याप्रसंगी नेहा जोशी यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो... जरा आख में भरलो पानी...’ हे गीत सादर केले. सुभेदार मेजर सतबिरसिंह म्हणाले, आम्ही देशाच्या सीमेवर देश व देशवासीयांचे रक्षण करीत असलो तरी आपली देशात काय प्रतिष्ठा आहे, याची आज जाणीव झाली. त्यामुळे देशसेवेच्या कार्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. संचालन शिवानी सौदेकर यांनी केले तर सविता खोकरे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)