पाणी पुरवठ्यातील कपातीचा मुद्दा मनपाच्या सभेत गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:24 IST2019-07-23T00:23:22+5:302019-07-23T00:24:26+5:30
मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे २३ जुलैला होणाऱ्या विशेष सभेमध्ये चर्चेचा हाच मुख्य मुद्दा करण्याच्या तयारीला विरोधी पक्ष लागला आहे.

पाणी पुरवठ्यातील कपातीचा मुद्दा मनपाच्या सभेत गाजणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे २३ जुलैला होणाऱ्या विशेष सभेमध्ये चर्चेचा हाच मुख्य मुद्दा करण्याच्या तयारीला विरोधी पक्ष लागला आहे.
मंगळवारी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे पाणी पुरवठ्यातील कपातीचा मुद्दा उचलणार आहेत. अशातच सोमवारी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयात याच विषयावरून बराच गोंधळ घातला. यावरून विरोधकांची व्यूहरचना स्पष्ट दिसत आहे. वनवे म्हणाले, पाणी पुरवठ्याच्या नियोजनात सत्तापक्ष पर्णपणे चुकला आहे. उन्हाळ्याच्या दिवसातच या समस्येचे नियोजन केले असते तर आज ही वेळ आली नसती. लिकेजमुळे अर्धे पाणी वाया जात आहे. लिकेज दुरुस्तीचे काम ओसीडब्ल्यूला दिले आहे. मात्र आतापर्यंत फक्त ३४ टक्के पाईपलाईनच बदलण्यात आल्या आहेत. ६६ टक्के पाईपलाईन आजही जुन्याच आहेत. यामुळे लिकेजचा प्रश्न वेळेत निकाली न काढणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.