सुनील चरपेनागपूर : जीवनदायिनी असलेल्या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह औद्योगिकीकरणाचा हव्यास आणि शासन व प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विषारी झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार देशभरातील ६२३ प्रमुख व मोठ्या नद्यांच्या अभ्यासाअंती २७१ नद्यांमध्ये २९६ प्रदूषित पट्टे आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रातील ५४ तर विदर्भातील सात प्रमुख नद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व नद्यांचे पाणी विविध शहरांसह छोट्या-मोठ्या गावांना पिण्यासाठी पुरविण्यात येते. या नद्यांच्या पाण्यात विविध घातक रसायने मिसळली जात असून, ती जलशुद्धीकरणात पूर्णपणे नष्ट होत नसल्याने त्यांचा मानवी आरोग्यावर आजारांच्या रूपाने वाईट परिणाम दिसून येत आहे. शिवाय, त्या नद्यांमधील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.
पाण्याचे प्रदूषण ओळखतात कसे?
प्रदूषण ओळखण्यासाठी पाण्यातील बीडीओ (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) आणि सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) चे प्रमाण मोजले जाते. बीडीओमध्ये पाण्यातील जिवंत सेंद्रिय कचरा (उदा. सांडपाणी) तर सीडीओ (केमिकल ऑक्सिजन डिमांड ऑक्सिजन डिमांड) मध्ये पाण्यातील औद्योगिक रसायने किंवा इतर न कुजणारे पदार्थ व घटक मोजले जातात. पाण्यात बीडीओचे प्रमाण ३ एमजी/लिटरपेक्षा कमी असेल तर ते पाणी स्वच्छ मानले जाते. हे प्रमाण ३ ते १० एमजी/लिटर असेल तर मध्यम प्रदूषित आणि १० एमजी/लिटरपेक्षा जास्त असेल तर अतिप्रदूषित मानले जाते. पाण्यात सीओडीचे प्रमाण १० ते २० एमजी/लिटर असेल तर ते पाणी स्वच्छ आणि त्यापेक्षा अधिक असेल तर प्रदूषित मानले जाते.
प्रदूषण तीव्रता
भारतातील नद्यांपैकी ४६ ते ५० नद्यांचे पाणी औद्योगिक कचरा व प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्राधान्य-१ व प्राधान्य-२ या श्रेणीतील नद्या सर्वाधिक प्रदूषित मानल्या जातात. या श्रेणीत ३७ पट्टयांचा समावेश असून, यातील पाण्यात बोओडीचा म्हणजेच जैविक ऑक्सिजनचा तुटवडा अत्यंत जास्त आहे. प्राधान्य-३ व प्राधान्य-४ या श्रेणीतील नद्या मध्यम प्रदूषित मानल्या जातात.
जलप्रदूषणात महाराष्ट्र अव्वल
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार नद्यांच्या प्रदूषणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात एकूण ५४ नद्या अति व मध्यम प्रदूषित असून, दुसऱ्या क्रमांकावर ३१ प्रदूषित नद्या असलेले केरळ, तिसऱ्या क्रमांकावर प्रत्येकी १८ प्रदूषित नद्या आलेले मध्य प्रदेश व मणिपूर आणि चौथ्या क्रमांकावर प्रत्येकी १७ प्रदूषित नद्या असलेल्या उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश आणि पाचव्या क्रमांकावर १६ प्रदूषित नद्या असलेले ओडिशा आहे.
महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या
अतिप्रदूषित म्हणजे प्राधान्य-१ श्रेणीत मिठी (मुंबई), काळू (ठाणे), कुंडलिका (रायगड), साबरमती, इंद्रायणी, प्राधान्य-२ मध्ये मुळा, मुठा, पवना, भीमा, मुळा-मुठा, इंद्रायणी, वैनगंगा, वर्धा, प्राधान्य-३ मध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, पूर्णा, कन्हान, कोलार, वेणा, उर्मोडी, घोड, वाघूर, प्राधान्य- ३ व ४ मध्ये कोयना, चंद्रभागा, दारणा, बिंदुसरा, सीना, पेल्हार, गिरणा, हिवरा, तिठूर, बोरी, वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, पंचगंगा, अंबा, भातसा, पांझरा, सूर्या, तानसा, मांजरा, रंगवली, गोमाई, कान, नागनदी व मोरना या नद्यांचा समावेश आहे.
Web Summary : Maharashtra's rivers face severe pollution, leading the nation with 54 affected waterways. Industrial waste and untreated sewage contaminate drinking water sources, posing health risks and endangering aquatic life. Urgent action is needed.
Web Summary : महाराष्ट्र की नदियाँ गंभीर प्रदूषण का सामना कर रही हैं, जिससे 54 प्रभावित जलमार्गों के साथ यह राष्ट्र में अग्रणी है। औद्योगिक कचरा और अनुपचारित सीवेज पीने के पानी के स्रोतों को दूषित करते हैं, जिससे स्वास्थ्य जोखिम और जलीय जीवन खतरे में है। तत्काल कार्रवाई की आवश्यकता है।