नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या  : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 20:57 IST2019-11-21T20:56:01+5:302019-11-21T20:57:08+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत आ.अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिले.

Help the affected farmers right away: Anil Deshmukh | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या  : अनिल देशमुख

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या  : अनिल देशमुख

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकऱ्यांचा साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत आ.अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिले.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा व मोसंबी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावेळी आम्हाला भरीव मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागपूर जिल्ह्यात केवळ १३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेता देण्यात आलेली मदत ही अत्यंत कमी आहे. राज्य सरकारच्यावतीने राज्यपालांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टर व फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरपर्यंत मदत जाहीर करण्यात आली. परंतु ही मदत कमी आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली आहे.त्याच धर्तीवर राज्यपालांनीसुद्धा केंद्राकडे अशी मागणी करावी, असेसुद्धा अनिल देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी अनिल देशमुख यांच्यासोबत आ. प्रकाश गजभिये, राहुल देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, बंडोपंत उमरकर, सतीश शिंदे, ईश्वर बाळबुधे, बाबा शेळके, उज्ज्वला बोढारे, राजू राऊत, किशोर चौधरी, अविनाश गोतमारे, किशोर बेलसरे, दीपक मोहिते,अनिल साठवणे, नंदलाल मोवाडे, गणेश पानतावणे, मनीष फुके, रुद्रांगण चव्हाण, उदयन बन्सोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकांनी कपात करू नये
जी काही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते ती मदत बँका परस्पर खात्यातून कापून घेतात. यामुळे मदत मिळून सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बँक ज्या पद्धतीने खात्यातून पैसे कपात करतात ते सुद्धा करण्यात येऊ नये, अशी मागणीसुद्धा यावेळी अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना केली.

Web Title: Help the affected farmers right away: Anil Deshmukh