कृषी प्रदर्शनात प्रचंड गर्दी

By Admin | Updated: December 14, 2015 03:12 IST2015-12-14T03:12:57+5:302015-12-14T03:12:57+5:30

कार्यशाळा आणि परिसंवादांनी परिपूर्ण असे सातवे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ रेशीमबाग मैदानावर सुरू असून, विदर्भासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांची गर्दी आहे.

Heavy rush with agricultural exhibit | कृषी प्रदर्शनात प्रचंड गर्दी

कृषी प्रदर्शनात प्रचंड गर्दी

आज अखेरचा दिवस : विविध राज्यांतील लाखो शेतकऱ्यांची हजेरी
नागपूर : कार्यशाळा आणि परिसंवादांनी परिपूर्ण असे सातवे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ रेशीमबाग मैदानावर सुरू असून, विदर्भासह विविध राज्यांतील शेतकऱ्यांची गर्दी आहे. रविवारपर्यंत लाखो शेतकरी व नागरिकांनी प्रदर्शनाला हजेरी लावली आणि नामांकित कंपन्यांनी प्रदर्शित केलेल्या उत्पादनांची प्रशंसा केली. राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे ‘अ‍ॅग्रो व्हिजन’चे प्रवर्तक आहेत. सोमवार, १४ डिसेंबर अखेरचा दिवस आहे. समारोप दुपारी ४ वाजता होणार आहे. सात मोठ्या डोममध्ये विविध कंपन्यांचे स्टॉल आहेत. याशिवाय खुल्या जागेत मोठ्या नामांकित कंपन्यांचे स्टॉल उभारले आहेत. उद्घाटन ११ रोजी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. यावेळी राजस्थानचे कृषिमंत्री प्रभुलाल सैनी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर आणि खासदार, आमदार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळांचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते झाले.
४०० कंपन्यांचे स्टॉल
प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सुमारे ४०० कंपन्यांचे स्टॉल तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विभागांचे स्टॉल आहेत. ट्रॅक्टर्स, रोटाव्हेटर्स यासारखी अवजड यंत्रे, छोटी अवजारे, बियाणे खते, कीटकनाशके इत्यादींसह अनेक क्षेत्रातील उत्पादने तसेच कृषिसंबंधी विविध सेवा देणाऱ्या संस्था, बँका, विमा कंपन्या, कृषी सल्लागार, मध्य भारतातील वितरक, चॅनल पार्टनर्स इत्यादी अनेक क्षेत्रातील लोकांना भेटण्याची संधी आहे.
यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा व
कृषी क्षेत्रात तरुणांना संधी

कृषी क्षेत्राशी संबंधित ४२ कार्यशाळांचे आयोजन, ही या प्रदर्शनाची विशेषत: आहे. रविवारपर्यंत झालेल्या ३१ कार्यशाळांमध्ये देशभरातील मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीत नवनवीन प्रयोगासाठी होणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, यावर भर आहे. शेतीला पूरक दुग्धव्यवसायाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, यावर मान्यवरांनी भर दिला. पेरणी ते मालाच्या विक्रीपर्यंत तसेच ऊस, कापूस, सोयाबीन, संत्री, डाळिंब या महत्त्वाच्या विषयांवर कृषी संशोधन व कृषी तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे. रेशीम उद्योग, मधमाशी पालन, शेळी व मेंढीपालन, कुकुटपालन इत्यादी जोडधंद्याविषयी माहिती देण्यात येत आहे. याशिवाय यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा आणि कृषी क्षेत्रात करिअरसाठी तरुणांना मार्गदर्शन हा कार्यशाळांचा मुख्य आकर्षणाचा विषय आहे.
डेअरी व्यवस्थापनावर आज परिषद
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहकार्याने ‘डेअरी व्यवस्थापन’ या विषयावर सोमवार, १४ डिसेंबरला एक दिवसीय परिषद रामदासपेठेतील हॉटेल तुली इम्पेरिअलमध्ये होणार आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी ९.४५ वाजता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ‘अ‍ॅग्रो व्हिजन’चे प्रवर्तक व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. या परिषदेत आयसीएआरचे डीडीजी (एएस) डॉ. के.एम.एल. पाठक, फ्युचर समूहाचे संस्थापक व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाल (हरियाणा) चे संचालक डॉ. ए.के. श्रीवास्तव, एमडीडीबीचे कार्यकारी संचालक संग्राम चौधरी, माफसु, नागपूरचे कुलगुरू प्रा. ए.के. मिश्रा, एमईडीसीचे अध्यक्ष दीपक नाईक, अ‍ॅग्रो व्हिजनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक गिरीश गांधी, संयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर व देवेंद्र पारेख उपस्थित राहतील. या मान्यवरांसह नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंदचे महाव्यवस्थापक डॉ. एम.आर. गर्ग, आयसीएआर-एनआयएएनपी, बेंगळुरूचे माजी संचालक डॉ. सी.एस. प्रसाद, माफसु, नागपूरचे प्रा. डॉ. नितीन मार्कंडेय व माजी प्राध्यापक डॉ. जी.बी. देशमुख, एनडीआरआय, कर्नालचे माजी सहसंचालक डॉ. जी.आर. पाटील आणि दिनशॉ डेअरीचे उपाध्यक्ष सुशील वर्मा उपस्थित राहतील. चारा व्यवस्थापन, गाईगुरांचे व्यवस्थापन, दुग्ध प्रक्रिया, दुधापासून तयार होणारी उत्पादने इत्यादी विषयांवर अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. परिषद डेअरी उद्योजक आणि प्रगत शेतकऱ्यांना फायद्याची आहे.

Web Title: Heavy rush with agricultural exhibit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.