‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते

By सुमेध वाघमार | Updated: June 28, 2025 19:46 IST2025-06-28T19:45:16+5:302025-06-28T19:46:16+5:30

डॉ. जे.सी. मोहन : ‘ईको’ नागपूर परिषदेत हृदयरोग तज्ज्ञ आले एकत्र

Heart function can be restored in 25 percent of heart failure patients | ‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते

Heart function can be restored in 25 percent of heart failure patients

नागपूर : ‘हार्ट फेल्युअर’ ही एक अशी स्थिती आहे जिथे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात किंवा कडक होतात, ज्यामुळे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. ही एक गंभीर स्थिती असलीतरी यावर नवी औषधे इतकी प्रभावी ठरत आहेत की जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये पुन्हा हृदयाचे कार्य सुरळीत करता येते. याशिवाय ५० टक्के रुग्णांवर आता प्रभावी नियंत्रण ठेवता येते, अशी माहिती सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे. सी. मोहन यांनी दिली.
   

‘इको नागपूर परिषद-२०२५’मध्ये ते मुख्य वक्ता म्हणून सहभागी झाले असताना ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मोहन म्हणाले, ‘हार्ट फेल्युअर’ आणि ‘हार्ट अटॅक’ यात मोठा फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये अचानक रक्तपुरवठा थांबतो, तर ‘हार्ट फेल्युअर’मुळे रक्त पंप करण्याचे क्षमता कमी होत जाते. शरीराच्या अवयवांना पुरेसा आॅक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. भारतातील जवळपास एक कोटी प्रौढ व्यक्तींना ‘हार्ट फेल्युअर’चा त्रास आहे.

‘हार्ट फेल्युअर’चे परिणाम कॅन्सरपेक्षाही वाईट
दुर्देवाने ‘हार्ट फेल्युअर’ या आजाराचा परिणाम अनेकदा काही कॅन्सरपेक्षाही वाईट असतो. कारण हा आजार ओळखला जात नाही, कमी गांभीर्याने घेतला जातो आणि वेळेवर उपचार होत नाहीत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºयांना ह्या आजाराचा धोका अधिक आहे, असेही डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले.
 

नव्या औषधांमुळे आयुष्य वाढवता येते
‘हार्ट फेल्युअर’ असलेल्या रुग्णांचे आयुष्य नव्या औषधांमुळे जवळपास सहा ते आठ वर्षांनी वाढवता येते. यासाठी लवकर निदान, योग्य औषधे आणि उपचार आवश्यक असतो. ईको, ईसीजी आणि काही रक्ततपासण्यांमधून या आजाराचे निदान केले जाते.

भारतीयांना कोलेस्टेरॉलची अधिक काळजी घ्यावी
या परिषदेत लिपिड असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी अध्यक्ष, डॉ. विनोद विजन यांनीही महत्त्वाचे निरीक्षण मांडले. भारतीयांची शरीररचना आणि आनुवंशिकता लक्षात घेता, भारतीयांनी जागतिक प्रमाणापेक्षा किमान १० पॉईंट्सने कमी कोलेस्टेरॉल टार्गेट ठेवायला हवे.
 

‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र
‘ईको परिषदे’चे कार्यक्रम संचालक डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले, हे ‘ईको’चे २१ वे वर्ष असून, आज सर्वसामान्य लोकही ‘इकोकार्डियोग्राफी’बद्दल जागरूक झाले आहेत. ‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र झाले आहे. या तंत्रज्ञानामळे हृदयातील त्रास लवकर ओळखता येतो. ४० वर्षांनंतर दरवर्षी ईको तपासणी करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील हृदयरोग तज्ज्ञ एकत्र आले आहेत. परिषदेतील विविध व्याख्यानांतून हृदयाच्या आजारांचे लवकर निदान, अचूक उपचार व बहुविशेषज्ञांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.

Web Title: Heart function can be restored in 25 percent of heart failure patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.