बलात्काऱ्यांचे पाठीराखे बनले सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:09 IST2018-04-17T00:09:29+5:302018-04-17T00:09:39+5:30
समाजाच्या सुरक्षेचे काम हे सरकारचे आहे. परंतु देशात लहानग्या चिमुकल्यांवर होत असलेले अत्याचार बघून, हे शासन निष्क्रिय झाल्याचे दिसते आहे. या मुलींवर झालेले अत्याचार हे समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे. तरीही सरकार अशा बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे, अशी खंत ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी व्यक्त केली.

बलात्काऱ्यांचे पाठीराखे बनले सरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजाच्या सुरक्षेचे काम हे सरकारचे आहे. परंतु देशात लहानग्या चिमुकल्यांवर होत असलेले अत्याचार बघून, हे शासन निष्क्रिय झाल्याचे दिसते आहे. या मुलींवर झालेले अत्याचार हे समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे. तरीही सरकार अशा बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे, अशी खंत ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी व्यक्त केली.
दक्षिणायन (महाराष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेद्वारे देशात कठुआ, उन्नाव आणि सुरतमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणाविरोधात निषेध आंदोलन दीक्षाभूमी चौकातील शाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ करण्यात आले. या निषेध आंदोलनाला उपस्थित लीलाताई चितळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनात प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने, विजय जावंधिया, अमिताभ पावडे, छाया सावरकर, उषा मिश्रा, सुषमा भड, रूपाताई कुळकर्णी, वीरा साथीदार, बिशप रोशन कांबळे, समीर महाजन, हरीश धुरट यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. २०१३ मध्ये निर्भयावर झालेला अत्याचार आणि कठुआ, उन्नाव व सुरत येथील बलात्काराच्या घटना यात काहीच फरक नाही. या सगळ्या घटनांमधले आरोपी तितकेच नीच नराधम आहेत. बलात्कारींना संरक्षण आणि त्यांच्या नेत्यांचे रक्षण करण्याचे प्रयत्न भाजपाच्या सरकारने केले आहे. बलात्कार प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे बलात्कार करणाºया आमदारांना अटक करण्याऐवजी, पीडितेच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याने त्यांचे न्यायालयीन कोठडीत निधन झाले. अशा अमानवी घटना आपल्या देशात घडत आहेत, हे अतिशय लज्जास्पद आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांनीही ‘स्टॉप व्हॉयलन्स’, ‘गर्ल्स आर नॉट आॅब्जेक्ट’, ‘जस्टिस फॉर आसिफा’ अशी फलक झळकविली होती. उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करीत, बलात्काऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.